Prakash Ambedkar on Amol Kirtikar : मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabhe Election 2024) पाचव्या टप्प्यात मुंबईतील (Mumbai Lok Sabha) सहा जागांसाठी मतदान पार पडणार आहे. मुंबईतील सहा जागांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात कमालीची चुरस पाहायला मिळत आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे (Mumbai North West Constituency) उमेदवार अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गोरेगाव, मुंबई येथील सभेत केला. ते वंचितचे उमेदवार परमेश्वर रणशुर यांच्या प्रचारसभेत बोलत होते.


वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "लोकसभेची ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीचा तमाशा आपण याठिकाणी बघत आहोत. बाप एका पक्षात, पोरगा एका पक्षात. जशी सत्ता काही आपल्या कुटुंबातून जाता कामा नये, अशी परिस्थिती याठिकाणी दिसत आहे. मित्रांनो हे नकली नाटक याठिकाणी झालंय, दिखाव्याचं नाटक झालंय, यावर आपण विश्वास ठेवू नका, असं आवाहन मी तुम्हाला करतो."



"शिवसेना(ठाकरे) यांची महाविकास आघाडीसोबत युती झाली आहे, असे सगळ्या प्रचार सभेत सांगितले जाते, पण मुंबईच्या कोणत्याही सभेत राष्ट्रवादी (शरद पवार) यांचा कार्यकर्ता दिसत नाही आणि काँग्रेसचे कार्यकर्ते देखील दिसत नाहीत. कदाचित मुंबईमध्ये तमाशा होणार आहे आणि या पक्षाचे तीनही नेते या तमाशात सहभागी असतील.", असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 


निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील : प्रकाश आंबेडकर 


मुंबई उत्तर पश्चिममध्ये एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा उमेदवार आहे आणि दुसऱ्या बाजूला अमोल कीर्तिकर उद्धव ठाकरेंचे उमेदवार आहेत. एक भाजपासोबत आहे पण, निवडणूक झाली तर दुसरासुद्धा भाजपसोबत शंभर टक्के जाणार आहे. मग काँग्रेसवाल्यांनो त्यांना मतदान का करत आहात? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. 


"खासगीकरणाच्या माध्यमातून इथल्या मागासवर्गीयांच्या आणि वंचितांच्या नोकऱ्या घालवल्या जात आहेत. खासगीकरण कशासाठी आहे? मालमत्ता लोकांची आहे आणि ती लोकांचीच राहिली पाहिजे, हे लक्षात घ्या, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. 2014 आणि 2019 मध्ये भाजप 70 ते 72 टक्क्यांवर निवडणुका घेऊन गेले होते. ते आता 50 आणि 60 टक्क्यांवर आले आहे. मतदान कमी झालंय, याचा फटका भाजपला बसणार आहे. आता ते 400 पार नव्हे 250 पर्यंत आलेलं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.