मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप पक्ष २२० ते २३० चा आकडा ओलांडणार नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, ही आमची गॅरंटी आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. महाराष्ट्र एकेकाळी देशाचे नेतृत्त्व करत होता. पण महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती अत्यंत भयंकर आहे. दिल्लीत महाराष्ट्राची अवस्था पायपुसण्यासारखी झाली आहे. राज्यकर्ते मूग गिळून गप्प आहेत. काही लोक मोदींना शिवाजी महाराज म्हणायला लागले आहेत. काल संसदेत एका मराठी खासदाराने मोदींना युगपुरुष म्हटले. या खासदराला लाज वाटली पाहिजे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे भाजपचे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत, अशी टीका राऊत यांनी केली. ते रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या लोकाधिकार अधिवेशनाच्या व्यासपीठावर बोलत होते. 


महाराष्ट्रात दोन लोकांनी भूमिपूत्रांसाठी लढा सुरु केला. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातून शिवसनेची स्थापना झाली. आपल्याला घाटी म्हणून हिणवले गेले. याच मराठी माणसाने मुंबई टिकवली. मराठी माणसाला नोकऱ्या हव्या आहेत. खोटी आश्वासनं द्यायला बाळासाहेब ठाकरे हे काही मोदी नव्हते. पंतप्रधान मोदी २०१४ पासून सांगतायत की, वर्षाला दोन कोटी रोजगार देऊ. मग आतापर्यंत २० कोटी नोकऱ्या व्हायला पाहिजे होत्या. मात्र, आता मोदी सांगतायत की पकोडे तळा, अशी टीका संजय राऊत यांनी केली.


भाजप हा फक्त उत्तर भारतीय पक्ष: कुमार केतकर


काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार कुमार केतकर यांनी लोकाधिकार अधिवेशनाच्या व्यासपीठावरुन भाजपवर टीकास्त्र सोडले. मोदी-शाह यांना वाटायला लागलं आहे की, आपल्याला पुन्हा तेवढ्या जागा मिळणार नाहीत. त्यामुळे ते अनेक घोषणा करत आहेत. आपणही त्यांच्या आहारी जात आहोत. भाजप हा फक्त उत्तर भारतीय पक्ष आहे. दक्षिणत त्यांना कुठेच स्थान नाही. मग भाजप कशाच्या जोरावर राष्ट्रीय पक्ष असल्याचा दावा करतो, असा सवाल केतकर यांनी केला. गुजराती मंत्री कसा अपमान करतात आणि मराठी माणसाकडे कसे तुच्छतेने पाहतात, याचा अनुभव आम्ही संसदेत दररोज घेतला आहे. आम्हाला भाजपचे अनेक खासदार भेटतात. ते सांगतात की, आमच्यावरही ईडीची नजर आहे. वेळ आली तर हे खासदार मोदी आणि शाह यांच्याविरोधात उभे ठाकतील. ते म्हणतात की, तुम्ही विरोधी पक्षाचा रीच वाढवा, त्याचा फायदा आम्हालाच होईल, असे केतकर यांनी सांगितले.



गुजरातची गिफ्ट सिटी ओसाड पडलेय: केतकर


गुजरातमधील बहुचर्चित गिफ्ट सिटी ओसाड पडलेली आहे. हिरे व्यापाऱ्यांनाही मुंबईतच राहायचे आहे. मुंबईत जे मिळू शकतं ते गुजरातमध्ये मिळू शकत नाही. डायमंड मार्केटमधील कर्मचारी आणि कामगारही मराठी आहेत. मात्र, नरेंद्र मोदी आणि अमित शाह महाराष्ट्रावर सूड उगवत आहेत, असे केतकर यांनी म्हटले.


 


आणखी वाचा


"देश 500 वर्ष मागे नेण्याची तयारी, मोदी-शाह अश्मयुगात घेऊन जाताय"; संजय राऊत कडाडले