मुंबई : वडील आणि दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा बालेकिल्ला असलेल्या परळी मतदारसंघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा(Pankaja munde) पराभव झाला. या पराभवानंतर विजयाचा गुलाल उधळण्यासाठी माजी मंत्री पकंजा मुंडेंना तब्बल 5 वर्षांची वाट पाहावी लागली. तत्पूर्वी, 2014 विधानसभा (Vidhansabha) निवडणुकीत पंकजा मुंडेंनी परळी मतदारसंघातून धनंजय मुंडेंचा तब्बल 24 हजार मतांनी पराभव करत मोठा विजय मिळवला होता. त्याचवेळी, गावकी-भावकीप्रमाणे अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसह पंकजा मुंडेंनी आनंदोत्सव साजरा करत विजयाचा गुलाल उधळला. मात्र, त्या गुलालानंतर संसदीय राजकारणातील (Politics) विजयाचा गुलाल उधळण्यासाठी तब्बल 10 वर्षांची वाट पाहावी लागली. त्यात, 2019 च्या पराभवानंतर जवळपास 5 वर्षांचा राजकीय वनवासच त्यांच्या नशिबी आला होता. त्यामुळे, आता विधानपरिषद निवडणुकीच्या (Election) निमित्ताने 10 वर्षानंतर पंकजा मुंडेंनी कुटुंबीयांसह विजयाचा गुलाल उधळला.  


विधानपरिषद निवडणुकींचा निकाल हाती आला असून भाजप नेत्या पंकजा मुंडेचा विजय झाला आहे. पंकजा यांच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी त्यांचं कुटुंब विधानभवनात दाखल झाल्याचं पाहायला मिळालं. विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडेंना 26 मतं मिळाली आहेत. त्यामुळे, या विजयानंतर पकंजा मुंडेंच्या समर्थकांनी जल्लोष केला असून विधिमंडळ परिसरात मुंडे कुटुंबीयही आनंदी असल्याचं दिसून आलं. 


बीड जिल्हा हा भाजप नेते गोपीनाथ मुंडेंचा बालेकिल्ला राहिला आहे,  अगदी सायकलवर फिरुन प्रचार करण्यापासून गोपीनाथ मुंडेंनी बीड जिल्ह्यात कमळ खुलवलं. परळी मतदारसंघातून ते राज्याच्या विधानसभेत पोहोचले. राज्याचे उपमुख्यमंत्रीपदही त्यांनी भूषवले. मात्र, 2009 साली गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले, त्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून त्यांची कन्या पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे, नाराज झालेल्या पुतण्या धनंजय मुंडेंची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली. मात्र, मुंडे कुटुंबातील भावकीच्या सुप्त संघर्षाला येथूनच सुरुवात झाली. या संघर्षातूनच धनंजय मुंडेंनी 2013 साली राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर, 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळीमधून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली, त्यामध्ये पंकजा यांनी 24 हजार मतांनी बाजी मारली.


2014 नंतर भाजपातील सुप्त संघर्ष


राज्यात 2014 भाजप महायुतीचं सरकार आल्यामुळे भाजप आमदार पंकजा मुंडेंना मंत्रीपदाची संधी मिळाली. राज्याचे ग्रामविकामंत्रीपद त्यांनी भूषवलं, दुर्दैवाने मे 2014 मध्ये गोपीनाथ मुंडेंचे अपघाती निधन झाले. त्यामुळे, बीडमधील राजकारण हे पंकजा मुंडेंभोवती फिरू लागलं. तर, गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसदार बनून त्या राज्याच्या राजकारणात पुढेही आल्या. दरम्यान, याच काळात भाजपमधील त्यांच्या वागण्या-बोलण्याची, त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांची राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा होऊ लागली. त्यातच, मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विधान त्यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात सुप्त संघर्ष सुरू झाल्याचं बोललं जायचं. त्यातच, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंचा पराभव झाला. यावेळी, भाजपच्याच काही नेत्यांनी धनंजय मुंडेंना ताकद दिल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने झाली.


2019 नंतर राजकीय वनवास


पंकजा मुंडेंचा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाऊ धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव झाला. या पराभवानंतर पंकजा यांचे राजकीय पुनर्वसन केलं जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती, आणि मुंडे समर्थकांना अपेक्षाही होती. मात्र, त्यांचे राजकीय पुनर्वसन केवळ चर्चेतच राहिले. भाजपकडून अनेक नवख्या चेहऱ्यांना आमदारकी मिळाली. मात्र, पंकजा मुंडेंना वेट अँड वॉच करावे लागले. विधानपरिषदेनंतर राज्यसभेसाठीही भाजपच्या काही नेत्यांची नावे चर्चेत आली. त्यावेळीही, पंकजा मुंडेंचं नाव पुढे आलं. मात्र, पंकजा मुंडेंच्या पदरी त्यावेळीही निराशाच आली. विशेष म्हणजे गोपीनाथ मुडेंचे समर्थक असलेल्या भागवत कराड यांना राज्यसभेवर घेऊन केंद्रीयमंत्री बसवण्यात आलं. पण, पंकजा मुंडेंना पुन्हा वेटिंगवरच ठेवण्यात आलं. त्यातच, 2024 च्या लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आणि भाजपकडून पंकजा मुंडेंना तिकीट देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि बीडमधील सामाजिक असमतोलतेचा फटका बसल्याने त्यांचा पराभव झाला. त्यामुळे, विजयाच्या गुलाल पंकजा मुंडेंपासून आणखी दूर केला होता. पण, भाजपने विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडेंना यंदा संधी दिली. 2024 च्या 11 जागांवरील विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने 5 नावे जाहीर केली, त्यात पंकजा मुंडेंना संधी मिळाली अन् पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपुष्टात आला. पंकजा मुंडेंनी संसदीय राजकारणात नोव्हेंबर 2014 नंतर जुलै 2024 मध्ये विजयाचा गुलाल उधळला आहे. पंकजा यांच्या या विजयामुळे मुंडें समर्थकांनीही आंनदोत्सव साजरा केला. 


धनंजय मुंडे अन् पंकजांमधील राजकीय संघर्ष


भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर धनंजय विरुद्ध पंकजा असा राजकीय संघर्ष सुरू झाला. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळीमधून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली, त्यामध्ये पंकजांनी बाजी मारली. मात्र, या विजयानंतर पंकजांना विजयासाचा गुलाल उधळण्यासाठी मोठी वाट पाहावी लागली. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर डिसेंबर 2016 मध्ये परळी नगरपालिकेची निवडणूक झाली. मुंडे कुटुंबीयांसाठी ही नगरपालिका नेहमीच महत्त्वाची ठरली आहे. यावेळेस पंकजा विरुद्ध धनंजय असं पुन्हा चित्र होतं. तेव्हा धनंजय मुंडे यांनी 33 पैकी तब्बल 27 उमेदवार निवडून आणत त्यांनी नगरपालिकेवर आपलं वर्चस्व सिद्ध केलं. या निवडणुकीनंतर भावा-बहिणीतली चुरस वाढली. 2017च्या सुरुवातीला लगेचच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने पुन्हा सर्वाधिक जागा मिळवल्या तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर होती. या जिल्हा परिषद निवडणुकीतच परळी तालुक्यामध्ये भाजपला मोठा फटका बसला. मे 2017 मध्ये परळी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली. 18 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात होते. अनेक वर्षं गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यात बाजार समिती होती. या बाजार समितीच्या निवडणुकीत पंकजा आणि धनंजय पुन्हा एकदा समोरासमोर उभे होते. दोघांनी आपापल्या दिवंगत वडिलांच्या नावांवर पॅनल उभे केले होते. त्यावेळी पंकजा यांच्या बहीण खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी प्रचार केला होता.


हेही वाचा


विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची शक्यता, कोणत्या पक्षाच्या आमदारांचे कुठल्या हॉटेलवर मुक्काम?