Tanaji Sawant: आगामी निवडणुकीच्या आनुषंगाने सर्व राजकीय पक्ष एकजूट असल्याचं दाखवत असले तर महायुतीत असलेली धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं चित्र दिसून येत आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या पक्षाबाबतीत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी बाबतीत राष्ट्रवादीसोबत आपले कधीच पटले नाही. कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आलं की उलट्या होतात असं वक्तव्य तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केलं आहे. 


काय म्हणालेत तानाजी सावंत? 


आपण हाडामासाचे शिवसैनिक आहोत. आयुष्यात कधी आपले काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आज जरी कॅबिनेटमध्ये पटलेले नाही. राष्ट्रवादीबरोबर मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात, आपल्याला त्यांची अॅलर्जी आहे, असं वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केल्याचं व्हायरल व्हिडिओतून समोर आलं आहे.


तानाजी सावंत नागरिकांशी संवाद साधतानाचे व्हिडिओ वायरल झाले आहेत. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तोंडसुख घेतल्याच्या चर्चा आहेत. यामध्ये ते म्हणतात, अगदी शिकत असल्यापासून आपल्यात शिवसेनेचे विचार परिपूर्ण भिनलेले आहेत. म्हणूनच काँग्रेस, राष्ट्रवादीची आपल्याला अॅलर्जी आहे. पुडी खाल्ल्यावर जशी उलटी होते तशी. आम्ही तत्वाशी बांधील आहोत, असंही सावंत म्हणालेत.


तानाजी सावंत यांच्या या व्हायरल क्लिपवरती उमेश पाटलांची प्रतिक्रिया


तानाजी सावंत (Tanaji Sawant) जे बोलले ते ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेले बरं, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिली आहे. महायुती झाली म्हणून सावंत मंत्री झाले, हे त्यांनी विसरू नये असंही पाटील यांनी पुढं म्हटलं आहे.


अमोल मिटकरींची सडकून टीका 


जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात , हाफकिन संस्थेला माणुस म्हणु शकतात,इतकंच काय आपला बुम ता. परंडा जि. धाराशिव येथील भैरवनाथ साखर कारखान्याचे उद्घाटन पवार साहेबांच्या हस्ते करू शकतात, दादांकडून निधी घेऊ शकतात ते काहीही बोलु शकतात, अशा शब्दात अमोल मिटकरींनी तानाजी सावंतांवर हल्लाबोल केला आहे. 




तानाजी सावंतांची आणखी एक व्हायरल क्लिप 


तानाजी सावंत राष्ट्रवादीबद्दल बोलण्याची ही काय पहिली वेळ नाही. सोशल मीडियावर तानाजी सावंत यांची आणखी एक क्लिप सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे धाराशिव लोकसभा बाबतीत बोलताना दिसत आहेत. “आपल्या मनाविरुद्ध तिकीट गेलं. ज्याला आपण मतदान करत नव्हतो त्यांना तिकीट दिलं. त्यामुळे मी मतदान करा असे म्हणायला तुमच्यापार्यंत आलो नाही. कारण आपल्यालाच पटलेलं नव्हतं" असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं आहे. तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी बद्दल त्यांची नाराजी उघडपणे दिसून येत आहे. दरम्यान तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची ही व्हायरल क्लिप नेमकी कधीची आहे याबाबतीत सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तसेच यांच्या सत्यतेबद्दल ही एबीपी माझा पुष्टी करत नाही.