Sharad Pawar : महाविकास आघाडी आणि महायुती यांना पर्याय देण्यासाठी संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी एकत्र येऊन परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी उघडली आहे. या तिसऱ्या आघाडीचा काही परिणाम होईल का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना विचारला होता. यावर शरद पवार यांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. या तिसऱ्या आघाडीचा नक्कीच परिणाम होईल. माझी तर झोप गेलीय आम्ही भयंकर अस्वस्थ आहोत अशा शब्दात शरद पवारांनी टोलेबाजी केली.


नेमकं काय म्हणाले शरद पवार?


राज्यात तिसरी आघाडी झाली आहे. ही तिसरी आघाडी संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी एकत्र येत तयार केली आहे. याचा काही परिणाम होईल का? असा सवाल प्रसारमाध्यमांनी शरद पवार यांनी विचारला होता. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, हे लोक एकत्र येतात म्हणजे याचा परिणाम होणारच. संभाजीराजे यांच्यासारखे  महान घराण्यातील लोक आहेत, यामुळं नक्कीच परिणाम होईल असे शरद पवार म्हणाले. तिसऱ्या आघाडीमुळं आमची झोप गेली आहे. आम्ही सगळे भयंकर अस्वस्थ आहोत, आता आमचं काय होणार? असा टोला देखील शरद पवारांनी लगावला. सांगलीत आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले. 


‘परिवर्तन महाशक्ती’ नावाने तिसरी आघाडी


विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ नावाने तिसरी आघाडी आकाराला येत आहे. त्यासाठी पुण्यात स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी, स्वराज्य पक्षाचे प्रमुख युवराज संभाजीराजे, प्रहार जनशक्ती पक्षाचे आ. बच्चू कडू, महाराष्ट्र राष्ट्र समितीचे शंकरअण्णा धोंडगे, स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, नारायण अंकुशे यांच्या उपस्थितीत ‘परिवर्तन महाशक्ती’ या आघाडीची घोषणा झाली आहे. ही आघाडी विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीला टक्कर देण्यासाठी ही आघाडी तयार करण्यात आली आहे. सध्या ज्याप्रकारचे राजकारण सुरू आहे, त्याला राज्यातील जनता कंटाळली आहे. त्यामुळेच आम्ही सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसऱ्या आघाडीचा पर्याय देण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वास आहे की, मतदार आम्हाला साथ देतील आणि सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी मदत करतील. तिसऱ्या आघाडीच्या जागा वाटपाबाबत आम्ही सर्व नेते बसून निश्चित चर्चा करू. संपूर्ण 288 जागांवर उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे संभाजीराजे यांनी सांगितले आहे. 


 


महत्वाच्या बातम्या:


Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात तिसरी आघाडी? आज महत्त्वाची बैठक, कोणकोणत्या पक्षांचा या आघाडीत समावेश?