छत्रपती संभाजीनगर : भाजपा महायुतीच्या उमेदवार आणि खासदार नवनीत राणा (Nanvneet Rana) यांनी आपल्या भाषणातून आक्रमक पवित्रा घेत एमआयएमच्या ओवैसी बंधुंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हैदराबादमधील (Hyderbad)भाजपा उमेदवार लता माधवी यांच्या प्रचारासाठी नवनीत राणांनी भाषण करताना, एमआयएमच्या नेत्यांना लक्ष्य केलं. अकबरुद्दीन ओवैसींच्या भाषणाचा संदर्भ देत, 15 मिनिटांसाठी नाही, केवळ 15 सेकंदांसाठी पोलीस हटवा मग ह्या दोन्ही भावांना कुठून कुठं पळावं हेही कळायंचं नाही, असे नवनीत राणांनी म्हटले होते. त्यानंतर, असदुद्दीन ओवैसींनी नवनीत राणांवर पलटवार केला. मात्र, राणा विरुद्ध एमआयएम असा वाद अद्यापही सुरूच आहे. आता, खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी नवनीत राणांवर शेलक्या शब्दात टीका केलीय. 


छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघात आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे संदिपान भुमरे, चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील या तिन्ही प्रमुख उमेदवारांकडून आज प्रचाराच्या शेवटच्यादिवशी मोठं शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. छत्रपती संभाजी नगरच्या पीर बाजारातून एमआयएमच्या वतीने इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ मोठ्या रॅलीचा आयोजन करण्यात आल आहे. या रॅलीत बोलताना, आपणच पुन्हा एकदा  खासदार म्हणून निवडून येणार असा विश्वास जलील यांनी व्यक्त केला. याशिवाय नवनीत राणांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी खासदार नवनीत राणांवर जोरदार पटलवार केला. काही लोक हे भाजपने भुंकण्यासाठी ठेवले आहेत, नवनीत राणा म्हणजे चिप मेंटॅलिटीची बाई असल्याचं जलील यांनी म्हटलं. त्यामुळे, आता जलील यांच्या टीकेला नवनीत राणा काय प्रत्युत्तर देतात हे पाहावे लागेल.  


कव्हरेज दिले तर डान्सही करायला लागेल


भारतीय जनता पार्टीला काही भूकणारे लोक हवे आहेत. याअगोदर हैदराबादचे आमदार भूंकण्यासाठी सोडलं होते, आता तो संपलेला आहे, म्हणून ह्या बाईला सोडलं आहे. नवनीत राणा ही चिप मेंटॅलिटीची बाई आहे. तुमचा धर्म आहे याचा आम्ही आदर करतो, पण हनुमान चालीसा उद्धव ठाकरे यांच्या घरासमोरच का वाचायची होती. चीप पब्लिसिटी घेण्यासाठी ही कोणत्याही इशूला मोठं करते, अशा शब्दात इम्तियाज जलील यांनी नवनीत राणांवर प्रहार केला. या बाईला असं वाटतं की कॅमेरा दिसला की आपली शूटिंग सुरू आहे. ओवैसी साहेब चार टर्म खासदार आहेत, त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे. पण, नवीन आलेल्या बाईला काही कळत नाही. जर तुम्ही तिला म्हणालात मी कव्हरेज देतो, तर ती डान्स करायलादेखील तयार होईल, असा खोचक टोलाही जलील यांनी लगावला. 


देशात सर्वात मोठा जल्लोष औरंगाबादमध्ये


औरंगाबादमध्ये सध्या निवडणुकीसाठी खूप चांगला माहोल आहे , 4 जूनला सगळ्यात मोठा विजय माझा होईल. देशात सगळ्यात मोठा जल्लोष औरंगाबाद शहरामध्ये माझा होणार आहे, असा विश्वास जलील यांनी व्यक्त केला. लोकांनी स्पष्ट केलेलं आहे,  2019 वेगळं होतं. आता 2024 ला लोकांनी मनात ठरवलंय, त्यामुळे ते पतंगालाच मतदान करतीली.