Rohit Pawar on Ajit Pawar :  येणाऱ्या काळात अजित पवार (Ajit Pawar) कदाचीत एकटेच पडतील. त्यांच्यासोबत असणारे जे नेते आहेत, ते त्यांच्यासोबत राहतील काही नाही, हा प्रश्न आहे. अजित पवारांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचीही (Eknath Shinde) स्थिती होईल. भाजप (BJP) नेहमीच मित्रपक्षाला संपवतं, असे आमदार रोहित पवार (Rohit Pawar News) म्हणाले. 2024 मध्ये हे पक्ष राहतील का? हा सर्वसामान्यांना प्रश्न पडलाय. काही आमदारांना धमकी घेऊन गेले आहेत, येणाऱ्या काळात हे आमदार आमच्यासोबत येतील, असा अंदाजही त्यांनी वर्तवला. कर्जतमधील महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत समारोप भाषणात रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा साधला.

  


अजित पवार आणि त्यांच्यासोबतचे आमदार हे त्यांच्यावर होणाऱ्या कारवाया थांबाव्यात, म्हणून भाजपसोबत गेले आहेत. हे भाजपला चांगलं माहितेय, त्यामुळे हळूहळू भाजप त्यांना दबावातच ठेवेल. विधानसभा निवडणुकीत तर दहा-20 जागाच देतील, असा टोला रोहित पवारांनी लगावला. कर्जतमधील महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत समारोप भाषणात रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा साधला.  


बैलाकडे पाहून प्रामाणिक कसं राहावं हे कळतं, जो मालक बैलाला लहानाचा मोठा करतो तो बैल मालकाला कधी विसरत नाही. आपण आपल्या आई वडिलांना कधी विसरत नाही, आपल्या गुरूला कधी विसरत नाही. आपल्या काकांना कधी विसरत नाही. पण आज काल लोक ते विसरतात. पण जाऊद्या ज्यांना विसरायचं त्यांना विसरु द्या. आपण संघर्ष करूयात, असे म्हणत आमदार रोहित पवारांनी नाव न घेता अजित पवारांना टोला लगावला.  कर्जतमधील महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत समारोप भाषणात रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी भाजप आणि विखे यांच्यावरही हल्लाबोल केला. 


अजित पवारांना सुनावलं 


राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नावावर अजित पवार गटाकडून आक्षेप घेतला जात असल्यावरून रोहित पवारांनी जोरदार निशाणा साधला आहे.ते कशावरपण आक्षेप घ्यायला लागले आहेत.आता हे लोक भाजपची भाषा बोलायला लागले आहेत, लोकशाही राहिली बाजूला आणि आता हे म्हणत आहेत की राष्ट्रवादी शरद पवार गटाला काहीच मिळालं नाही पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. पण आम्ही लढू आणि लवकर आम्हाला चिन्ह देखील मिळेल आम्ही निवडणूक आयोगाकडे एकच चिन्ह देणार आहोत आणि ते आम्हाला मिळेलच कारण ते चिन्ह याआधी कोणत्याही पक्षाने वापरलेले नाही असं रोहित पवार म्हणाले.


पुढील सात दिवसांत निवडणूक आयोगाकडून आम्हाला चिन्ह मिळेल. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आम्ही त्याच चिन्हावर आणि पक्षाच्या नावावर लढू, असे रोहित पवार म्हणाले. 


भाजपवर टीकास्त्र -


आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याच्या चर्चेचे आमदार रोहित पवारांनी खंडण केले आहे. आम्ही जागा वाटपाबाबत सर्वांचा विचार आणि मतं ऐकूण घेतो. भाजपासारखं निर्णय दुसऱ्यावर लादत नाही. महायुतीत आताच भाजप आपलं मतं अजित पवार गट आणि शिंदे गटावर लादत आहे...लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला या दोन्ही गटाची गरज आहे, तरीही भाजप आताच त्यांचं मतं या दोन्ही गटावर लादत आहे, त्यावरून विधानसभेत या दोन्ही गटाला भाजप तिकीट तरी देईल का? याची शंका येते असं रोहित पवारांनी म्हटले आहे.



मराठा आरक्षणावरही रोहित पवार काय म्हणाले ?


राज्यात मराठा लोकसंख्या 28 टक्के असताना सरकारने 10 टक्के आरक्षण कसे दिले असा प्रश्न राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिलं गेलं. त्यानंतर भाजप सरकारकडून 13 टक्के आरक्षण दिलं गेलं आणि आता दहा टक्के आरक्षण दिलं गेलं आहे, म्हणजेच भाजप मराठा आरक्षणाची टक्केवारी कमी कमी करत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. ओबीसी मधून आरक्षण द्यायचं की नाही हा सरकारचा प्रश्न आहे मात्र जे पण आरक्षण दिलं जात आहे हे टिकलं पाहिजे ही गोष्ट महत्त्वाची आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारशी बोलून मराठा समाजाला दोन महिन्यापूर्वीच आरक्षण दिलं गेलं असतं यासोबतच धनगर समाजाला, लिंगायत समाजाला आणि मुस्लिम समाजाला देखील आरक्षण दिले गेले असत पंतप्रधान मोदी राज्यात येतात मात्र या नेत्यांमध्ये त्यांच्याशी या विषयावर बोलण्याचं धाडस नसल्याचे देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे.


सुजय विखेंवर हल्लाबोल - 


विखे कुटुंब या पक्षातून त्या पक्षात का जातात?  विखे विचारांना पक्के नाहीत.शरद पवारांची परंपरा संघर्षाची आहे. त्यांनी विचार जपला आहे त्याच्यासाठी संघर्ष केला आहे. सुजय विखेंनी आधी त्यांच्या कुटुंबाचा अभ्यास करावा असं म्हणत रोहित पवारांनी सुजय विखेंवर निशाणा साधला आहे. भाजप खा. सुजय विखे यांनी रोहित पवारांवर टिका करताना सौ चुहे मारकर बिल्ली चली हज करणे ही म्हंटलं होतं. ज्यांनी सगळ्यांचीच घर फोडली. ते आज त्यांचं घर फुटलं तर दुसऱ्यावर बोलतात , हा एक कर्मा असतो जो जसं करेल त्याला तसं भोगाव लागेल आणि ते भोगत आहेत असा घणाघात सुजय विखे पाटलांनी रोहित पवारांवर केला होता.


राम शिंदेंना टोला -


आमदार राम शिंदे यांचं सरकारमध्ये काहीही चालत नाही, सिना नदीचे पाणी शेतकऱ्यांना मिळावे यासाठी त्यांनी उपोषणाचा इशारा दिला नाही तर एका अधिकाऱ्याला निलंबित करा म्हणून त्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. म्हणजेच यांचा इगो हर्ट झाला म्हणून ते उपोषणाला बसणार होते असं म्हणत रोहित पवारांनी राम शिंदेंवर निशाणा साधला आहे. कुकडी विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांच्यावर शिस्तभंग आणि निलंबन कारवाई करावी या मागणीसाठी राम शिंदे आंदोलन करणार आहेत, यावरून रोहित पवारांनी निशाणा साधला आहे.