Manoj Jarange Patil in Mumbai Azad Maidan: मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आणि सगेसोयऱ्यांचे आरक्षण ही मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील मराठा आंदोलक शुक्रवारी सकाळी मुंबईत दाखल झाले. मनोज जरांगे यांच्यासोबत आलेले हजारो मराठा आंदोलक (Maratha Reservation) आणि त्यांच्या तब्बल 3000 गाड्यांनी चेंबूर ते छत्रपती शिवाजी महाराज स्थानकापर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सध्या पूर्व मुक्त महामार्गावर (Eastern Free Way Mumbai) मराठा आंदोलकांच्या वाहनांची अनेक किलोमीटरची रांग लागली आहे. तर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सकाळी 10 वाजता आझाद मैदानात दाखल झाले आणि त्यांनी उपोषणाला सुरुवात करत असल्याची घोषणा केली. मनोज जरांगे पाटील हे आधीपासून ही शेवटची आणि आरपारची लढाई आहे, असे सांगत आले आहेत. शुक्रवारी आझाद मैदानावर केलेल्या भाषणातही मनोज जरांगे पाटील यांनी आता माघार घ्यायची नाही, असा संदेश मराठा समाजाला दिला. यावेळी मनोज जरांगे यांनी टाकलेले दोन डाव सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. जरांगे पाटलांनी टाकलेल्या या दोन डावांमुळे महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांच्यासह पाच हजार मराठा आंदोलकांना आझाद मैदानावर आठ तास उपोषण करण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे मनोज जरांगे आज सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच उपोषणाला बसू शकणार आहेत. मात्र, आझाद मैदानावर भाषणाला उभे राहताच मनोज जरांगे पाटील यांनी आता मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही, असा इरादा जाहीर केला. सरकारने आम्हाला बेमुदत उपोषण करण्याची परवानगी द्यावी, असे त्यांनी म्हटले. मराठ्यांना विजय मिळवून दिल्याशिवाय, डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून कुणी हलायचं नाही. मला गोळ्या घातल्या तरी चालतील, पण आता समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय मागे हटणार नाही. मनोज जरांगे हटणार नाही, ह्याच ठिकाणी उपोषण करून मेलो तरीही, मराठ्यांच्या अंगावर गुलाल टाकल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मनोज जरांगे पाटील आठ तासांची मुदत संपल्यानंतर माघारी परतरणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मनोज जरांगे आता आझाद मैदानावरच ठाण मांडून राहिल्यावर काय करायचे, हा मोठा प्रश्न महायुती सरकारसमोर आ वासून उभा राहिला आहे. 

Mumbai Ganesh Utsav 2025: मनोज जरांगेंचा मास्टरस्ट्रोक

आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात करताना मनोज जरांगे पाटील यांनी आणखी एक मास्टरस्ट्रोक खेळला. तो म्हणजे जरांगे पाटील यांनी स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी गणपतीची मूर्ती ठेवली. मनोज जरांगे मुंबई येण्यापूर्वी भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. मनोज जरांगे गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आल्यास मोठी अडचण होईल. यामुळे हिंदुंच्या सणात विघ्न येईल, असा मुद्दाही उपस्थित केला जात होता. मात्र, मनोज जरांगे यांनी आम्ही मुंबईत गणेशोत्सवाला कोणतेही गालबोट लागू देणार नाही, असे आश्वासन दिले होते. आज मैदानावर उपोषणाला बसताच मनोज जरांगे पाटील यांनी त्यापुढे जात आणखी एक कृती केली. मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसण्यापूर्वी स्टेजवर गणपतीची मूर्ती आणण्यात आली. गणपतीची ही मूर्ती शिवाजी महाराजांच्या बाजूला ठेवण्यात आली. या गणपतीच्या मूर्तीची आरतीही करण्यात आली. या माध्यमातून मनोज जरांगे पाटील  आणि मराठा आंदोलकांनी एकप्रकारे  मुंबईतील गणेशभक्तांच्या मनात सॉफ्ट कॉर्नर निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हा मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील मास्ट्ररस्ट्रोक ठरण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

आणखी वाचा

2 तासांत मुंबई रिकामी करा...; आझाद मैदानात पोहोचताच मनोज जरांगे असं का म्हणाले?