मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) मनोज जरांगे (Manoj Jarange) जालना मतदारसंघातून महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) उमेदवार असल्याची चर्चा आहे. अशात मनोज जरांगेंना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरावचं लागणार आणि त्यांना उमेदवारी देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aaghadi) करण्यात आली आहे. आता यावर महाविकास आघाडीमधील महत्वाचे नेते आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "जालन्यातून मनोज जरांगेंना उमेदवारी देण्याबाबत कोणताही प्रस्ताव नाही" असे म्हणत राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 


यावर बोलतांना राऊत म्हणाले की, "जालन्यातून मनोज जरांगेंना उमेदवारी देण्याबाबत कोणताही प्रस्ताव नाही,  वंचित बहुजन आघाडीसह जागा वाटप पार पडलंय, आता उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या उपस्थितीत घोषणा केली जाईल. कोणती जागा कोणाला मिळेल यासंदर्भात वाद नाही, प्रत्येक जागेवर विजय होणं महत्त्वाचं असल्याचं" राऊत यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे मविआच्या जागावाटप बैठकीनंतर संजय राऊतांनी ही माहिती दिली आहे. 


महाविकास आघाडीत कोणत्याही जागेवर मतभेद नाही...


महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बोलतांना राऊत म्हणाले की, "जागा वाटपाबाबत अंतिम चर्चा झाली आहे. महाविकास आघाडी, वंचित आघाडी महत्त्वाचा घटक आहे. सर्व 48 जागांवर चर्चा पूर्ण झाली आहे. त्यावर चर्चा करून काही निर्णय झालेले आहेत. कोणत्याही जागेवर मतभेद नाही. वंचित बहुजन आघाडीचे नेते बैठकींमध्ये हजर आहेत. काल त्यांच्याकडून एक प्रस्ताव आलेला आहे, 27 जागांवर त्यांनी निवडणुकीची तयारी गेल्या काही महिन्यांपासून सुरू केली आहे. वंचित बहुजन आघाडी हा देशातील हुकूमशाही विरोधात प्रभावी पक्ष आहे. वंचित आघाडीची जी हुकूमशाही विरोधात भूमिका आहे, तीच महाविकास आघाडीचे भूमिका आहे, असं राऊत म्हणाले आहेत. 


गुजरातचा उडता गुजरात झालेला आहे...


शरद पवार यांचा हात धरून मी राजकारणात आलो, शरद पवार हे माझे राजकीय गुरू आहेत असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. सिंचन घोटाळा करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, असं मोदी म्हणाले होते. मात्र, आता त्यांनी अजित पवारांनाच आपल्याच पक्षात घेतलं आणि उपमुख्यमंत्री केलं. गुजरात हे विकासाच्या मार्गावर पुढे आहे. गुजरातचा विकास झाला तर देशाचा विकास होईल असं मोदी वारंवार सांगतात. अनेक प्रकल्प त्यांनी गुजरातला नेले.  तसंच त्यांनी ड्रग्जचा व्यापार ही गुजरातला नेला आहे. म्हणून गुजरातला हजारो कोटींचा ड्रग्स उतरत आहे. नाशिक, पुण्यात, मुंबईत ज्या प्रकारे ड्रग्सचा फैलाव झालेला आहे, ते सर्व ड्रग्स गुजरातच्या मार्गाने महाराष्ट्रात पोहोचत आहे. गुजरातचा उडता गुजरात झालेला आहे, असेही राऊत म्हणाले आहेत. 


बडगुजर सूडबुद्धीने गुन्हा दाखल....


नाशिकच्या ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून,  तो सूडबुद्धीने केला आहे. ज्या कार्यक्रमाला बडगुजर गेले होते, त्या कार्यक्रमाचे नियोजन भाजपच्या कार्यकर्त्यांनी ककेले होते. भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल नाही, कारवाई नाही, पण बडगुजर आमचे पदाधिकारी असल्याने गुन्हा दाखल केला आहे, असेही राऊत म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Sanjay Raut : मोदींच्या हुकूमशाहीविरोधात लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आमच्यासोबत : संजय राऊत