Ambadas Danve : विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाच्या (Thackeray Group) अडचणी वाढू शकतात. ठाकरे गटाचे अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. ठाकरे गटाच्या विधानपरिषदेतील जागांची संख्या कमी होत असल्याने अडचण वाढण्याची शक्यता आहे.


विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी काल (18 जून) शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी ठाण्यातील आनंदाश्रम येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनिषा कायंदे यांची सचिवपदी नियुक्ती केली. 


विधानपरिषदेची गणितं कशी बदलली?


आधी विप्लव बजौरिया आणि मग मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जागा कमी झाल्या आहेत. ठाकरे गटाच्या आमदारांची संख्या 9 झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या देखील 9 आहे. सध्या ठाकरे गटाचे अंबादास दानवे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. जर राष्ट्रवादीने दावा केला तर त्यांचं पद जाऊ शकतं. एकीकडे अजित पवार हे विधासभेचे विरोधी पक्षनेते आहेत, म्हणजेच हे पद राष्ट्रवादीकडे आहे, त्यात आता विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीने दावा केला तर ठाकरे गटाच्या अडचणी वाढू शकतात.


...तर काँग्रेसकडूनही विरोधी पक्षनेतेपदावर दावा?


शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहेत. त्यापैकी शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे या उपसभापती आहेत. तर विरोधी पक्षनेतेपदही ठाकरे गटाकडेच आहेत. सध्या ठाकरे गटाकडे 9 राष्ट्रवादीकडे 9 आणि काँग्रेसकडे 8 जागा आहेत. विधानपरिषदेत पाच अपक्ष आमदार आहेत. त्यापैकी किशोर दराडे यांनी ठाकरेंना पाठिंबा दिला आहे तर सत्यजीत तांबे यांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. त्यामुळे ठाकरे गटाचं संख्याबळ 10 होतं तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं संख्याबळ 9-9 असं बरोबरीत येतं. दराडेंनी पाठिंबा बदलला तर मात्र गेम बदलू शकतो. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला त्यांनी पाठिंबा दिला तर दावा केला जाऊ शकतो. विरोधी पक्षनेते आणि उपसभापतीपद ठाकरेंकडेच असल्यामुळे केवळ राष्ट्रवादीच नाही तर काँग्रेसकडूनही दावा होऊ शकतो. सध्या महाविकास आघाडीमध्ये मतमतांतराचं चित्र पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्षनेतेपद कोणीही सोडणार नाही, त्यामुळे संख्याबळ कोणाकडे जातं हे पाहावं लागेल.   


विधानपरिषदेतील संख्याबळ


(मनिषा कायंदे शिंदे गटात आल्यानंतरचं चित्र)
भाजप : 22
ठाकरे गट : 09
शिवसेना : 02
राष्ट्रवादी काँग्रेस : 09
काँग्रेस : 08
अपक्षइतर : 07
रिक्त जागा : 21