Malvan Rajkot Fort Disput : सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्यावर असलेला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटल्याचं पाहायला मिळालं. या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. राज्यभरात या घटनेच्या पार्श्वभूमीवर आंदोलनं सुरू आहेत. अशातच आज महाविकास आघाडीकडूनही राजकोट किल्ल्यावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. ठरल्याप्रमाणे महाविकास आघाडीचे नेते त्याठिकाणी पोहोचले. पण, त्यासोबतच महायुतीचे नेतेदेखील तिथे दाखल झाले. खासदार नारायण राणेंसह माजी खासदार निलेश राणे देखील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी राजकोट किल्ल्यावर पोहोचले. कधीकाळी सहकारी असलेले आणि आता एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले ठाकरे आणि राणे आमने-सामने आले. त्यानंतर काही काळ राजकोट किल्ल्यावर तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. दोन्ही पक्षांचे कार्यकर्तेय आपापसांत भिडले, त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं. त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते किल्ल्याची पाहाणी करण्यासाठी निघून गेले.


मालवण येथील राजकोट किल्ल्यावर भाजप खासदार नारायण राणे आणि निलेश राणे समर्थकांसह दाखल झाले होते.  पाहणी करुन नारायण राणे आणि निलेश राणे समर्थकांसह परत निघालेले असताना मविआचे पदाधिकारी देखील तिथे दाखल झाले. आदित्य ठाकरे, विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यावेळी तिथं पोहोचले.  शिवसैनिक आणि राणे समर्थक आमने सामने आले होते. याठिकाणी थोडी बाचाबाची झाली. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.


नारायण राणेंचा आक्रमक पवित्रा


आम्ही आमच्या भागात आहोत, बाहेरचे येऊन इथं दादागिरी करत असतील, पोलीस त्यांना प्रोटेक्शन देणार असतील तर आम्ही इथून अजिबात हलणार नाही, काही करायचे ते करा, गोळ्या घाला हलणार नाही, असे आंडू पांडू आयुष्यभर पाहिले, आम्ही इथून जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा नारायण राणे यांनी घेतला. 


नेमकं काय घडलं? 


महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर असलेला पुतळा कोसळला. याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळत आहेत. राज्यात या प्रकरणावरुन संतापाची लाट उसळली आहे. अशातच याच घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राजकोट किल्ल्यावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार, महाविकास आघाडीतील काही नेते राजकोट किल्ल्यावर पोहोचले. नेमके त्याचवेळी महायुतीचे नेते, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे देखील राजकोट किल्ल्यावर पाहाणी करण्यासाठी दाखल झाले. यावेळी काँग्रेस नेते आणि विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार देखील उपस्थित होते. 


कधीकाळी सहकारी आणि आता कट्टर विरोधक असलेल्या नारायण राणे आणि विजय वडेट्टीवार यांनी आमने-सामने आल्यानंतर हस्तांदोलन केलं. महाविकास आघाडीकडून मोर्चा आयोजित करण्यात आल्याने माजी खासदार विनायक राऊत यांचे समर्थकसुद्धा राजकोट किल्ल्यावर पोहोचले. मात्र, ठाकरे आणि राणे आमने-सामने आल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. नारायण राणे समर्थक आणि विनायक राऊत समर्थक आमने सामने आल्यानं राजकोट किल्ल्यासमोर घोषणाबाजी देत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रसंग घडला. हा राडा एका बाजूनं सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेसुद्धा पोहोचले. यावेळी पेंग्विन, पेंग्विन अशा घोषणा देण्याचा प्रयत्न केला. पण आदित्य ठाकरे कोणतीही प्रतिक्रिया न देता, किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी निघून गेले. 


राणे समर्थकांनी आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना किल्ल्यावर जाऊन देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. पण आदित्य ठाकरे आणि वैभव नाईक किल्ल्यावरील एका पायरीवर ठाण मांडून बसले. यावेळी नितेश राणे आणि त्यांचे समर्थक ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आव्हान देत होते. त्यावेळी वैभव नाईक यांनी 15 मिनिटांत आम्हाला रस्ता खाली करुन दिला नाही तर आम्ही आमची ताकद दाखवून देऊ. आम्ही आतमध्ये घुसू, असं म्हटलं. यावर राणे समर्थनक आणखीनच संतापले आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.


त्यांची बुद्धी तेवढीच, बालबुद्धी तेवढी राहते, उंचीप्रमाणे बुद्धी आहे : आदित्य ठाकरे 


राड्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले की, "स्टॅच्यु ऑफ लिबर्टी असेल, छत्रपती शिवरायांचा गेट वे ऑफ इंडियाचा पुतळा आगे. हे सगळं होत असताना इथे भाजपवाल्यांनी चोरी करुन हे सगळं लावलं आहे. तो 24 वर्षांचा मुलगा आहे कुठे? त्याला कंत्राट दिलं कोणी होतं? तो फरार आहे, त्याला पळून जायला मदत केली का? जसं भाजपवाल्यांनी रेवन्नाला पळून जायला मदत केली होती. तशीच यालाही केली का? ही सर्व उत्तरं मिळाली पाहिजे, तसेच, जे मंत्री आहेत, पीड्ब्यूडीएफचे त्यांच्यावर यासाठी एफआयआर झालंय का?"


"मला वाटतं हे दुर्दैवी आहे. हा बालिशपणा आहे. आम्ही येत असताना कुठल्यातरी एका कॅमेरामनला धक्काबुक्की झाली आणि त्यापासून हा सर्व प्रकार सुरू झाला. मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे. अशा महाराजांच्या किल्यामध्ये आपण तरी राजकारण करायचं नाही. म्हणूनच मी इथे सगळ्यांना अडवून धरलं आहे. या बालिशपणात मला पडायचं नाही. त्यांची बुद्धी तेवढीच आहे. बालबुद्धी तेवढी राहते, उंचीप्रमाणे बुद्धी आहे."


काही बालबुद्धीवाले नेते इकडे आले होते, उंची इतकीच त्यांची बुद्धी आहे. त्यांना वाटत असेल, पण आम्ही कोंबड्या वगैरे आणल्या नाहीत, असं आदित्य ठाकरे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे राणे समर्थक आणखीनच चवताळले. यानंतर त्यांनी राजकोट किल्ल्यात असलेल्या आदित्य ठाकरे यांना बाहेर पडू देणार नाही, अशी भूमिका घेतली. 


एकीकडे राणेंचा राडा, तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंची संयमी भूमिका 


मालवणातील सिंधुदुर्गात राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे आणि नारायण राणे आमने-सामने आल्यानंतर मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यावर येताच राणे समर्थकांनी पेंग्विन पेंग्विन अशी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही गटाचे समर्थक आपापसांत भिडले. राजकोट किल्ल्यावर जोरदार राडा पाहायला मिळाला. एकीकडे राणे समर्थकांसोबतच माजी खासदार निलेश राणे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पण, दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी अत्यंत संयमी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. 


राणे समर्थकांनी आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना किल्ल्यावर जाऊन देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. पण आदित्य ठाकरे आणि वैभव नाईक किल्ल्यावरील एका पायरीवर ठाण मांडून बसले. पोलिसांकडून कार्यकर्त्यांना शांत करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. तर, दुसरीकडे आदित्य ठाकरे अत्यंत शांतपणे किल्ल्याच्या आत कार्यकर्त्यांसोबत थांबले होते. त्यावेळी आदित्य ठाकरेंसोबत विनायक राऊत, अंबादास दानवे, राजन साळवी, विनायक राऊत यासोबतच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील उपस्थित होते. 


नारायण राणेंची एबीपी माझाच्या रिपोर्टरशी दमदाटी 


मालवणीमधील राजकोट किल्ल्यावर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. त्यावेळी नारायण राणे, निलेश राणे उपस्थित होते. यासंदर्भातलं वार्तांकन करण्यासाठी एबीपी माझाचे रिपोर्टर घटनास्थळी हजर होते. त्यावेळी नारायण राणे पोलिसांसोबत बोलत होते. त्याचवेळी एबीपी माझाचा माईक नारायण राणेंनी पाहिला आणि आक्रमकपणे त्यांनी तो माईक ओढण्याचा प्रयत्न केला आणि रिपोर्टरसोबत दमदाटी केली. 


दरम्यान, मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अपघात प्रकरणी आता महाविकास आघाडीचे नेते मैदानात उतरणार आहेत. मालवणमध्ये महाविकास आघाडीने मोर्चाचं आयोजन केलंय. आदित्य ठाकरे, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील,  विनायक राऊत हे मोर्चात सहभागी झाले. आज मालवणमध्ये भरड नाका ते मालवण तहसीलदार कार्यालय असा धडक मोर्चा काढण्यात येणार होता. त्यापूर्वी पाहाणी करण्यासाठी आदित्य ठाकरे आणि इतर महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर दाखल झाले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाची एवढी घाई का करण्यात आली. तसेच या घटनेशी संबंधित सर्व अधिकारी, कंत्राटदार आणि इतर यंत्रणेच्या बेजबाबदारीचा जाब या आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना विचारण्यात येणार आहे. यासह पक्षाच्यावतीनं सर्व राज्यभरात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी स्थानिक पातळीवर आंदोलन करण्याचं आवाहनदेखील करण्यात आलं आहे. 


पाहा व्हिडीओ : Rajkot Fort Rada : Aaditya Thackeray यांची एन्ट्री,राणे-नाईक भिडले; राजकोटवरील तुफान राडा UNCUT