Maharashtra Politics: राज्यात आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आलाय. दापोलीतील कुणबी भवनाच्या (kunbi Bhavan) जागेवरून आता भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या वादात या भूखंडासाठी शिवसेनेचे आमदार योगेश कदम आणि भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण हे दोन नेते आमने-सामने आले आहेत. एकाच दिवशी कुणबी भवनाच्या दोन जागांच्या उद्घाटनावरून भाजप आणि शिंदे जुंपणार असल्याचं चित्र तयार झालं आहे. 


विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुती सध्या जागा वाटपावरून चर्चा सुरू असून मराठा कुणबी ओबीसी  आरक्षणाचा मुद्दा राज्यभर तापला आहे. दरम्यान रत्नागिरीत कुणबी  भवनाच्या भूमिपूजन सोहळ्याला राजकीय रंग लागण्याची चिन्हे आहेत.


एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी उद्घाटन


विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून किमान एक तरी जागा मिळावी यासाठी काँग्रेस आग्रही आहे तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटात कुणबीभवनाच्या जागेवरून वाद होताना दिसत आहेत. शिवसेनेचे आमदार योगेश कदम आणि भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कुणबी भवनाच्या जागेचा भूमिपूजन होणार असल्याचं कळतंय. 


नक्की नाराजी कशामुळे?


कुणबी समाज उन्नती संघ मुंबई आणि ग्रामीण अशा दोन कुणबी समाज उन्नती संघांना कुणबी भवनासाठी दोन्ही नेत्यांकडून वेगवेगळे भूखंड निवडले आहेत. यात कुणबी समाज उन्नती ग्रामीण संघाच्या भूमिपूजनाच्या निमंत्रण पत्रिकेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार संजय कदम यांचे नाव तर विद्यमान आमदार योगेश कदम आणि रामदास कदम यांचे नावही वगळले आहे. तर दुसरीकडे समजून ती संघ मुंबई कडून होणाऱ्या भूमिपूजनाच्या निमंत्रण पत्रिकेत देखील स्थानिक भाजप नेत्यांची नावे वगळल्याने कुणबी समाजात देखील दोन गट पडल्याचे दिसतात. 


कुणबी भवनाच्या भूमिपूजनावरून भाजप शिवसेनेत नवी फोडणी 


एकाच दिवशी कुणबीभवनाच्या दोन जागांचे उद्घाटन होणार असून विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर दापोलीतील या भूखंडाचा वादामुळे भूमिपूजन सोहळ्याला राजकीय रंग लागण्याची चिन्हे आहेत. आता शिवसेनेचे आमदार योगेश कदम आणि भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण दोन वेगवेगळ्या ठिकाणी कुणबी भवनाच्या भूखंडाचे भूमिपूजन करणार आहेत. त्यामुळे एकाच दिवशी दोन जागांच्या उद्घाटनावरून दापोलीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या वादाला नवी राजकीय फोडणी मिळाल्याची चर्चा आहे. 


कुणबी समाजात फूट पाडण्याचा भाजपचा डाव?


दरम्यान उमेदवार बदलून मागणाऱ्या भाजपच्या केदार साठेंवर आमदार योगेश कदम यांनी जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले मी ज्या संस्थेला जागा दिली ती मातृसंस्था आहे. भाजपकडून कुणबी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं शिंदे गटाचे योगेश कदम म्हणालेत. मला राजकारण करायचे नाही असेही ते यावेळी म्हणाले.