PM Modi Shivaji Park Sabha : मुंबई : अखेर 17 मे रोजी मुंबईत (Mumbai News) पार पडणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सभेसाठी मनसेला शिवाजी पार्क (Shivaji Park) येथील मैदान उपलब्ध करून देण्यात आलं आहे. या मैदानावरून मनसे (MNS) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे (Thackeray Group) गटात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं होतं. अखेर सभेसाठी मनसेला मैदान उपलब्ध करून देण्यात आलं आहे. यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 


18 मार्चला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं शिवाजी पार्क मैदान निवडणुकीच्या सांगता सभेसाठी उपलब्ध व्हावं यासाठी अर्ज करण्यात आला होता. या अर्जाचा विचार करून मुंबई महानगरपालिकेला फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर मनसेला मैदान उपलब्ध करून दिल्याची माहिती समोर आली आहे, अशी माहिती मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिली आहे. 


उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं मनसेनं सत्तेचा गैरवापर करा हे मैदान पदरात पाडून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. ठाकरे गटाचा हा देखील दावा आहे की, पहिला अर्ज हा आमच्या वतीनं दाखल करण्यात आला होता. मात्र, मुंबई महानगरपालिका असो की, नगर विकास खाते असो दोन्ही सत्ताधारी पक्षाकडेच असल्यामुळे त्यांनी आमच्या अर्जाला केराची टोपली दाखवत मनसेला मैदान उपलब्ध करून दिलं आहे, अशी माहिती अनिल देसाईंनी दिली आहे. 


पर्यायी मैदानांचा विचार सुरू : अनिल परब 


2009 मध्येसुद्धा सारखीच परिस्थिती निर्माण झाली होती. निवडणुकीच्या प्रचार सांगता सभेसाठी मनसेकडून आणि शिवसेनेकडून अर्ज करण्यात आले होते. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आधी अर्ज केला होता. त्यामुळे त्यांना परवानगी देण्यात आली होती. शासनाच्या वतीनं विविध कार्यक्रमांसाठी 39 दिवस राखीव ठेवण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त जर त्या ठिकाणी सभा घ्यायची असेल, तर नगर विकास खात्याची परवानगी घ्यावी लागते. यंदा दोन अर्ज आल्यामुळे परवानगीचा मुद्दा हा नगर विकास खात्याच्या कोर्टात जाऊन पडला होता. आम्ही आधी अर्ज दिला होता. आम्हाला परवानगी मिळणं अपेक्षित होतं, आता जरी मनसेला परवानगी मिळाली असली तरी आम्ही पर्यायी मैदानाचा विचार करत आहोत, अशी माहिती अनिल परबांनी दिली आहे. 


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मैदान मिळालं असलं तरी यंदाची पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा ही विशेष लक्षवेधी आहे. कारण या आधी कधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्क येथील मैदानात सभा पार पडली नव्हती. यापूर्वी भाजपचे नेते अटल बिहारी लालकृष्ण अडवाणी गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन अशा दिग्गज नेत्यांची सभा पार पडली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच या मैदानात सभा घेणार आहेत. 


दरम्यान, एकंदरीतच महायुतीची शेवटच्या टप्प्यातली मुंबईतली होणारी सभा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे या ठिकाणी होणारे भाषण या बाबी पाहता मुंबईतल्या सहा आणि मुंबईच्या आसपासच्या लोकसभा मतदारसंघावर मतांचा टक्का वाढवण्यासाठी मदत करतील हे मात्र नक्की आहे.