मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) आता आरएसएस (RSS) आणि भाजपा (BJP) अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईच्या म्हाळगी प्रबोधिनी येथे संघाचे पदाधिकारी आणि भाजप नेत्यांमध्ये कालपासून बैठका सुरु आहेत. तर आजच्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) स्वतः उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती याचा संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जाणार आहे. सोबतच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या विषयांवर देखील चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. 


मुंबईतील उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आज दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाराष्ट्र राज्या समन्वय आणि भाजप नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीत आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी भाजपा नेते आणि संघ पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक असणार आहे. सकाळी 11 वाजल्यापासून या बैठकीला सुरवात झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ही महत्त्वपूर्ण बैठक असणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या लोकसभेचे वारे वाहत आहेत, त्यामुळे संघ आता अॅक्टिव्ह मोडवर आला आहे. काल शनिवारी देखील याच ठिकाणी बैठक पार पडली होती. तर, शनिवार आणि रविवार दोन दिवस संघाचे पदाधिकारी आणि भाजप नेत्यांमध्ये ही बैठक होणार आहे. यात सरकारची कामगिरी आणि लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती याचा संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जाणार आहे. 


भाजपकडून लोकसभेची जोरदार तयारी...


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले असून, भाजपकडून देखील जोरदार तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे. तसेच, कोणत्या मतदारसंघात भाजपला प्रतिसाद मिळत असून, कोणत्या मतदारसंघात आणखी काम करण्याची गरज आहे याचा सतत आढावा घेतला जात आहे. तसेच, थेट बूथ निहाय कार्यकर्त्यांचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे, आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे भाजपचे राज्यातील आणि केंद्रातील मंत्री आपापल्या मतदारसंघात निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे. 


पाच राज्यातील निवडणुकीनंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला...


एकीकडे लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी भाजपकडून सुरू असताना, दुसरीकडे पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. या तीनही ठिकाणी भाजपची सत्ता स्थापन होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. एकंदरीत या विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास आणखीनच वाढला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून ताकदीने उतरण्याची तयारी सुरु असून, यासाठीच संघाची मदत देखील भाजपला मिळणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


कांदा उत्पादकांसाठी 'केंद्र सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, पियुष गोयल यांचं फडणवीसांना आश्वासन