अकोला/ अहमदनगर :  शिर्डी लोकसभा मतदारसंघातून (Shirdi Lok Sabha Seat) महाविकास आघाडीकडून (MVA) उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupwate) यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. उत्कर्षा रुपवते यांनी अकोला  येथे वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या उपस्थितीत उत्कर्षा रुपवते यांनी प्रवेश केला. यावेळी वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे हे उपस्थित होते. उत्कर्षा रुपवते शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून इच्छुक होत्या. मात्र, मविआच्या जागावाटपात ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेली. या मतदारसंघात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे आणि वंचितनं उमेदवारी जाहीर केल्यास वंचितकडून उत्कर्षा रुपवते यांच्यात तिरंगी लढत होऊ शकते. 


महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव, राज्य महिला आयोगाच्या सदस्या, प्रदेश काँग्रेस प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांनी कालचं काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर तातडीनं त्यांनी अकोल्यात  वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला. 


प्रकाश आंबेडकर यांच्याशी काही दिवसांपूर्वी चर्चा


शिर्डीसाठी उत्कर्षा रुपवते या वंचितच्या संपर्कात असल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. रुपवतेंनी काही दिवसांपूर्वी मुंबईत आंबेडकरांची भेट घेतली होती.  


भाऊसाहेब वाकचौरेंना उमेदवारी जाहीर होताच रुपवते आक्रमक झाल्या होत्या. गेली अनेक वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला डावलत असल्याचा आरोप करण्यात आला होता. उत्कर्षा रूपवते या गेल्या अनेक दिवसांपासून पक्षश्रेष्ठींकडे ही जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी करत होत्या.  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उत्कर्ष रूपवते या आक्रमक झाल्या  होत्या. त्यांनी पक्षश्रेष्ठींनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली होती. 


देशभर न्याय यात्रा काढणारे राहुल गांधी पक्षातीलच युवकांना न्याय देणार का असा सवाल सुद्धा उत्कर्षा रुपवते यांनी यापूर्वी   एबीपी माझाशी बोलताना उपस्थित केला होता. शिर्डी हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून ठाकरे गटाने दिलेला उमेदवार चुकीचा असून भाऊसाहेब वाकचौरे यांच्या बद्दल जनतेत उदासीनता असल्यानं त्याचा फेरविचार पक्षाने केला पाहिजे, असं रुपवते यांनी म्हटलं होतं. 


दरम्यान, शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी वंचितकडे पुण्यातील नामवंत उद्योजक विनोद अहिरे यांनी उमेदवारीची मागणी केली होती. अहिरे मुळचे नगर जिल्ह्यातील कोपरगावचे आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी अकोल्यातील आंबेडकरांच्या 'यशवंत भवन' या निवासस्थानी आंबेडकरांची भेट घेतली होती.यामुळं वंचित कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.


संबंधित बातम्या : 


पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि मविआचं आज जोरदार शक्तीप्रदर्शन, हायव्होल्टेज जागांवर होणार अर्ज दाखल; दिग्गजांच्या लढतींचं काऊंटडाऊन सुरु


Kolhapur Loksabha : 17 माजी महापौर आणि 220 माजी नगरसेवकांचा कोल्हापुरात शाहू महाराजांना जाहीर पाठिंबा!