Shinde Group Vs Shiv Sena: शिवसेना सोडणाऱ्यानी अनेक कारणे दिली मात्र ही कारने काही वास्तवाला धरून नाहीत, त्यांनी केवळ स्वार्थापोटीच शिवसेना सोडली असल्याचा टोला शिवसेनेचे माजी आमदार व भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांनी शिंदे गटाला लगावला आहे. शिवसेनेचा कल्याण ग्रामीण रायते येथे कार्यकर्ता मेळावा आज सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेचे युवा सेना ठाणे जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर, कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख सुभाष भोईर, युवा सेनेचे सह सचिव जयेश वाणी, कल्याण शहर प्रमुख सचिन बासरे, उल्हासनगरचे राजेंद्र चौधरी, अलताफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते.


उद्धव ठाकरे गट व शिंदे गटातील संघर्ष वाढत चालल्याने राजकीय वातावरण तापत चालले आहे. शिंदे गट व उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटांकडून ताकद वाढवन्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही गटांकडून मेळावे घेत आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला जातोय. मुंबई ठाणे पाठोपाठ कल्याण डोंबिवली देखील शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र शिंदे यांच्या बंडाळीनंतर शेकडो नगरसेवक पदाधिकारी  शिंदे गटात सहभागी झाल्याने शिवसेनेसमोर पर्यायाने उद्धव ठाकरे यांच्या समोर आवाहन उभे ठाकले आहे. शिवसेनेसमोर असलेलं हे आवाहन पेलण्यासाठी आता शिवसेनेची पहिली फळी पुन्हा मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे.


आज कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात पहिल्या फळीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची हजेरी लक्षणीय होती. यावेळी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांनी केलेल्या बंडाळी बाबत मनातील खदखद व्यक्त केली. यावेळी भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख व शिवसेना माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी ज्याना आपेक्षा होती, त्यांनी शिवसेना सोडली. त्यामागे त्यांचा स्वार्थ होता. मात्र जे लोक उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे. तेच खरे शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक आहेत. निष्ठावान शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यांना जो प्रतिसाद मिळत आहे, ते पाहता राज्यातील शिवसैनिक आणि सामान्य नागरीक उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आहे, असं ते म्हणाले.


शनिवारी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरी सत्कार प्रसंगी मोदी आणि शाह यांनी उद्धव ठाकरे यांना कोणताही शब्द दिला नव्हता, असा गौप्यस्फोट केला होता. याबाबत बोलताना म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांनी अनेकवेळा स्पष्ट केले की, स्वर्गीय बाळासाहेब यांच्या खोलीत चर्चा झाली होती. त्या चर्चे संदर्भात आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या मुलाखतीत सांगितले होते. समसमान वाटप होणार होते. आत्ता हा शब्द फिरवला जातो. त्यामुळे ते त्यांनाच विचारा अस उत्तर त्यांनी दिलं.