Jitendra Awhad on Dhanajay Munde : संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर (Santosh Deshmukh Murder Case) मागील दीड महिन्यापासून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर आरोप असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच गुरुवारी धनंजय मुंडे हे भगवानगडावर दाखल झाले. तर आज शुक्रवारी (दि. 31) नामदेव शास्त्री महाराज (Namdev Shastri Maharaj) यांनी धनंजय मुंडे यांना भक्कमपणे पाठिंबा दर्शविला. धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नाही तरी त्यांना जाणूनबुजून गुन्हेगार ठरवले जात आहे. धनंजय मुंडे हे खंडणीवर जगणारे नेते नाहीत, गेल्या 53 दिवसापासून मिडिया ट्रायल सुरू आहे, असे त्यांनी म्हटले. आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 


गेल्या काही वर्षात खून झालेल्या वंजारी समाजातील लोकांची नावे आव्हाड यांनी वाचून दाखवत यांना न्याय मिळणार आहे का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. तर मी शंभर टक्के सांगतो खून धनंजय मुंडे यांनी केलेला नाही. पण ते निर्दोष नाहीत. या गँगला पोसण्याचं काम राजकीय राजाश्रय देण्याचं काम त्यांनी कळत न कळत केलं, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. तसेच आदरणीय माणसांनी आपल्या शब्दांना मर्यादा द्याव्यात.  त्यांनी संतोष देशमुख यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी असल्याचे देखील त्यांनी म्हटले. 


जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना टोला


दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील टोला लगावला आहे. त्यांनी म्हटलंय की, दादा सांगतात की चुकला तर मोक्का लावीन पण त्यांनीच सांगितले की, त्यांनी मोक्कातले आरोपी सोडलेत. दादा एकमेव आहेत ज्यांनी सांगितलं की मी मोक्क्यातले आरोपी सोडवले. माझे फक्त विनंती असेल बाकी काहीही करा पण मोक्यातला आरोपी वाल्मिक कराडला सोडवायला जाऊ नका. मुंडेंचं काही करू शकत नाही हे आम्हाला माहित आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.


श्रीमंत जिल्हा मिळाला असता तर ते खुश झाले असते का?


महायुतीत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद सुरु आहे. अलीकडेच नरहरी झिरवाळ यांनी मी गरीब असल्याने मला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्रिपद दिलं, असे वक्तव्य केलं. याबाबत विचारले असता जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मला एक कळत नाही पालकमंत्री म्हणजे खाद्य मिळतं का जास्तीच?  झिरवाळ पण बोलले की, मी गरीब आहे म्हणून मला गरीब जिल्हा दिला.  गरिबी नाहीशी करण्यासाठी हिरवाळ यांना पालकमंत्रीपद हवंय की काय? पालकमंत्रिपद हे फावडा घेऊन खणण्याचं पद आहे की काय? मला झिरवाळ साहेबांना एकदा भेटून बोलायचं आहे की, त्यांची गरिबी दूर करण्यासाठी श्रीमंत जिल्हा मिळाला असता तर ते खुश झाले असते का? मला आज समजलं दादा पालकमंत्री-पालकमंत्री का करतात?  पालकमंत्री हे पैशाचं स्त्रोत्र आहे, हे ऐकून मला वाईट वाटलं.  मी अतिशय चांगले पालकमंत्री या ठिकाणी बघितले. पालकमंत्री म्हणजे डीपीडीसीच्या फंडातून 5 टक्के कमिशन हे पालकमंत्री नाहीत. मला हे सगळं बघितल्यानंतर वाईट वाटतं की हे काय चालू आहे? अशी टीका त्यांनी यावेळी केली.  


आणखी वाचा 


Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका