अकोला: मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याने जाणीपूर्वक महाराजांच्या डाव्या डोळ्याच्या वर कपाळावर खोक (जखमेची खूण) ठेवून दिल्याचा गंभीर आरोप अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला. शिल्पकार जयदीप आपटेला पुतळा घडविण्याचे कंत्राट कुणी दिले, याची चौकशी करण्याची मागणी मिटकरी यांनी केली. ते गुरुवारी अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 


मी स्पष्टपणे सांगितले की, आपटे नावाचा व्यक्ती त्याला साधा प्रपंच चालवायची अक्कल नाही. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायचं कंत्राट कोणी आणि कसं दिलं हेच हास्यास्पद आहे. जयदीप आपटेने हे काम कसे केले? जयदीप आपटेला हे कंत्राट कसे मिळाले? कोणता मंत्री त्याला पाठीशी घालतोय?, याची चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की, जयदीप आपटे हा जिथे कुठे दडून बसला असेल त्याला शोधून काढावे, असे मिटकरी यांनी म्हटले.


राजकोट किल्ल्यावर ताशी 45 किमी वेगाने वारे वाहत होते म्हणून पुतळा कोसळला, असे सांगितले जात आहे. पण मग मुंबईतील राजभवन आणि वर्षा बंगल्यावरही तितक्याच वेगाने वारे वाहतात? मग तिकडे पडझड का होत नाही, असा सवालही मिटकरी यांनी उपस्थित केला.


जितेंद्र आव्हाडांचा जयदीप आपटेबाबत गंभीर आरोप


शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही जयदीप आपटे याच्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. याबाबत आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मालवणच्या राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणारा जयदीप आपटे हा फेसबुकवर आपल्या एका मित्राशी माजल्यासारखा बोलतो. त्याचा मित्रही याच्यासारखाच; पुतळ्याच्या डोक्यावर आठवणीची खूणही ठेवली आहेस, असे तो म्हणतो. त्यावर आपटे, " पुतळा बनवताना पूर्ण अभ्यास करावा लागतो." असे सांगतो. जर आपटेने पुतळा साकारताना हाच अभ्यास केला असता तर महाराष्ट्राला अपमानित व्हावे लागले नसते. या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले की आपल्या महाराजांवर वार करणाऱ्या अफजलखानाचा वकील कृष्णा कुलकर्णीच्या औलादी आजही जिवंत आहेत. कुलकर्ण्याने केलेला तो वार फक्त महाराजांवर नव्हता, तर तो वार स्वराज्यावर होता मराठी मनावरची न मिटणारी जखम म्हणूनच महाराजांनी आपल्या तलवारीने कुलकर्ण्याचे मुंडके छाटले, हा इतिहास आहे. परंतु,दोन मित्रांमधील फेसबुकवरील चर्चा आणि त्यामध्ये महाराजांच्या डोक्यावरील खुणेचा उल्लेख करून ती दाखवणे... किळस येते ! या आपटेला आपटावासा वाटतोय, असे आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.




आणखी वाचा


जयदीप आपटे RSS चा माणूस, त्यामुळे ब्राँझचा पुतळा बनवूनही डोक्याजवळ कागद आणि कापूस ठेवला, नाना पटोलेंचे गंभीर आरोप