Ajit Pawar Call IPS Anjana Krishna: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर फोनवरुन दमदाटी केल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. महिला पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna) आणि अजित पवारांच्या व्हिडीओ कॉलची क्लीप व्हायरल झाल्यानंतर, आणि माध्यमांत हे वृत्त झळकल्यानंतर आता संबंधित गावातील शेतकरी आणि फोन लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवारांना अडचणीत आणणाऱ्या सोलापुरातील कुर्डू इथल्या 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे की, हा व्हिडीओ जाणीवपूर्वक व्हायरल केला जात आहे आणि अजित पवारांनी शेतकरी विरोधी कारवाई थांबवण्यासाठीच निर्देश दिले होते.
याचा अर्थ कारवाई थांबवा असं त्यांनी म्हटलेलं मी अजिबातच ऐकलेलं नाही
याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सुनील तटकरे यांनी म्हटलं की, प्रशासनाकडे रोखठोक बोलून जनतेला त्वरित न्याय मिळवून देणे ही अजित पवारांच्या कामाची खासियत आहे. गैरवाजवी कामांमध्ये ते कधीच बोलत नाहीत. अजित पवारांचा आवाज त्यांनी ओळखला नसेल, स्वाभाविकपणे त्या त्यांचं बोलत होत्या, रोखठोक बोलणं, प्रशासन असो किंवा जनता, ताबडतोब न्याय मिळणं ही दादांच्या कामाची खासियत आहे, गैरवाजवी कामामध्ये अजित पवार कधी बोलत नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणचा त्या वेळचा जो प्रसंग होता, त्यावेळी ते बोललेलं मी ऐकलं, आता वातावरण तणावाचं आहे, माहिती घेऊन त्याबाबत बोलू असं होतं, याचा अर्थ कारवाई थांबवा असं त्यांनी म्हटलेलं मी अजिबातच ऐकलेलं नाही, त्यांच्या स्वभावातच नाही असंही सुनीव तटकरेंनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.
महिला अधिकारी जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना ओळखत नसेल तर...
तर आनंद परांजपे यांनी याबाबत अजित पवारांची पाठराखण करताना म्हटलं की, "डीवायएसपी रँकची एखादी महिला अधिकारी जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना ओळखत नसेल तर हे देखील चुकीचं आहे, संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, अजित पवार स्पष्ट बोलतात, योग्य निर्णय घेतात, त्यामुळे शेतकऱ्यांची बाजू देखील जाणून घेतली पाहिजे.तोपर्यंत कारवाई थांबवावी अशा प्रकारचे ते निर्देश होते, असं आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे. तर या घटनेनंतर अजित पवारांना अडचणीत आणणाऱ्या कुरुडू येथील बाबा जगताप, नितीन माळी, संतोष कापरे, अण्णा धाणे यांच्यासह पंधरा ते वीस ग्रामस्थांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार आल्यानुसार करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजना कृष्णा या घटनास्थळी पोहचल्या. मुरुम उचलण्याच्या मुद्यावरुन कुर्डू गावातील नागरीक आणि अंजली कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबा जगताप या कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून अंजली कृष्णा यांच्या हातात दिला. मात्र त्यांना अजित पवार आणि त्यांचा आवाज ओळखता आला नाही. तिकडून अजित पवार दोनदा सांगताना दिसले की डीसीएम अजित पवार बोल रहा हूं. ये कार्यवाही बंद करो...मेरा आदेश हैं.. त्यावर कृष्णा म्हणतात मेरे फौन पर काॅल करें..त्यावर पवार म्हणताहेत..की तुम पे अॅक्शन लूंगा.. इतनी डेरिंग है तुम्हारी..मेरा चेहरा तो पेहचानोगा ना..असे रागावून अजित पवार बोलले आणि अजित पवारांनी व्हिडीओ काॅल केला. त्यावर कृष्णा बांधावरच जाऊन बसून पवारांशी बोलताना दिसल्या...यात अजित पवार कार्यवाही थांबवण्याचे आदेश देत असल्याचे पहायला मिळत असून...माझा फोन आलाय...तहसीलदारांना सांगा असे पवार सांगताना दिसतात.
कोण आहेत आयपीएस अंजना कृष्णा? (Who is IPS Anjana Krishna?)
1. आयपीएस अंजना कृष्णा मूळच्या केरळच्या त्रिवेंद्रममधल्या2. 2023 मध्ये यूपीएससी 355 रँकने उत्तीर्ण, आयपीएस केडर3. सुरुवातीला होम केडर, त्रिवेंद्रममध्ये एसीपीची जबाबदारी4. मग महाराष्ट्रात सोलापूर ग्रामीण पोलिसात कार्यरत5. प्रोबेशन कालावधीत पंढरपूरमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी6. अतिशय कडक शिस्तीच्या अधिकारी अशी ओळख निर्माण 7. करमाळ्यात अवैध व्यवसायाविरोधात कारवाईचा धडाका8. दोन दिवसांपूर्वी अवैध मुरूम उपसा सुरू असताना माढा तालुक्यातील कुर्डू येथे कारवाई 9. याच कारवाईसंदर्भात अजित पवारांशी बोलताना ठाम भूमिका