Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या प्रश्नानंतर आता शिक्षकांच्या प्रश्नासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) आक्रमक झाले आहेत. दिव्यांगांचं मानधन सहा हजार रुपयांचं करावं, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र, सरकारनं एक हजार रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे मानधन वाढीसाठी आंदोलन उभारलं पाहिजे. हे मानधनासाठीचं नव्हे तर, उद्योगाचा आणि रोजगाराचा प्रश्नही या आंदोलनाच्या माध्यमातून सुटला पाहिजे आणि त्यासाठी लढायचं नाही का? मग लढले पाहिजे तर, गर्दी झाली पाहिजे. येत्या 28 ऑक्टोबरला जे मुंबईत आंदोलन आहे त्यासाठी तालुक्यात फिरावं लागेल. त्यामुळे सरकारला खाली खेचण्याच्या आंदोलनासाठी वर्गणी जमा करा, सात दिवसांचा शिधा जमा करून मुंबईत आंदोलन करू, असे म्हणत दिव्यांगांच्या प्रश्नासाठी प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) हे पुन्हा आक्रमक झाले आहेत. यावेळी त्यांनी सरकारला थेट इशारा देत मुंबईत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
बच्चू कडू यांनी ओढले राज्य सरकारवर ताशेरे
मोर्चा कुठेही असू दे भंडाऱ्यातून 10 हजार दिव्यांग बांधव सहभागी झाले पाहिजे. आंदोलनात तुम्ही जर उपस्थित झाले, तर मानधनाचा नाही तर प्रश्न उद्योगाचा आहे, रोजगाराचा आहे. ज्यांना दोन पाय आहेत ज्यांना डोळे राहतील या लोकांसाठी सरकार वेळ देत नसेल तर सरकारला खाली खेचता आलं पाहिजे. गणपतीत लोक गावात वर्गणी गोळा करतात ना? दुर्गादेवीची वर्गणी गोळा करतात ना? मग आंदोलनाची वर्गणी गोळा करायला काय हरकत मग? मुंबईला आंदोलनासाठी जाणाऱ्या एका गाडीचा खर्च दहा-वीस हजार रुपये येत असेल तर वर्गणी गोळा करायला काय गेलं? आपण सगळ्यांनी दोन-दोन, पाच-पाच किलो गहू, तांदूळ गोळा केले पाहिजे आणि सात दिवसात आंदोलनासाठी ते सोबत घेतले पाहिजे. आणि आंदोलनात वर्गणी दिली तर सरकार एका दिवसात हलणार. मग आंदोलन करायचं की नाही करायचं असा प्रश्न यावेळी बच्चू कडू यांनी केला. तर यावेळी उपस्थित दिव्यांगांनीही कडूंच्या या प्रश्नाला तात्परतेने दुजोरा दिला.
....तर बच्चू भाऊ मेला तरी बेहत्तर
दरम्यान, काही लोक फोन करतात आणि विचारतात बच्चुभाऊ यायची काही सोय आहे का? बच्चुभाऊच्या पोराचं लग्न आहे का? मानधन बच्चू कडू मागणार का? बच्चुभाऊ तुम्ही केवळ लढा, आम्ही कुठे काही कमी पडू देणार नाही, असं तुम्ही मला ठणकावून सांगा. तेव्हा बच्चू भाऊ मेला तरी बेहत्तर. कमी पडणार नाही. असं आवाहन बच्चू कडू यांनी भंडाऱ्यात शेतकरी शेतमजूर यात्रेदरम्यान दिव्यांगांना मार्गदर्शन करताना केलं.
इतर महत्वाच्या बातम्या