हिंगोली : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर अनेक पक्षामध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. हिंगोलीत बंडखोरीचा फटका महायुतीला बसणार आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या शिवाजी जाधव (Shivaji Jadhav) यांना फोन करुन महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचं आवाहन केल्याचं समोर आलं आहे. मुख्यमंत्री शिंदेंसह महायुतीकडून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे, पण शिवाजी जाधव आपल्या निर्णयावर ठाम आहेत.


हिंगोलीत महायुतीची डोकेदुखी वाढली


हिंगोली लोकसभा मतदारसंघात (Hingoli Lok Sabha Constituency) महायुतीने (Mahayuti) शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde Group) उमेदवाराला तिकीट दिलं असताना शिवाजी जाधव (Shivaji Jadhav) यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत अर्ज दाखल केला आहे. याचा फटका शिंदेसनेचे उमेदवार बाबूराव कदम यांना बसण्याची शक्यता आहे. 


हिंगोलीत महायुतीला फटका बसण्याची शक्यता


हिंगोली लोकसभेचे मतदान दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. हिंगोली लोकसभेची निवडणूक जरी तिरंगी होत असली तरी महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. कारण भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवाजीराव जाधव यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केला होता. पण ही निवडणूक जिंकण्यासाठी लढतोय आणि त्यासाठीच अपक्ष उमेदवारी भरल्याचं शिवाजी जाधव यांनी सांगितल्याचं समोर येत आहे.


शिवाजी जाधव निवडणूक लढण्यावर ठाम


हिंगोली लोकसभेत महायुतीत बंडखोरी झाल्याचं दिसत आहे. शिंदे गटाचे उमेदवार बाबूराव कदम (Baburao Kadam) यांना तिकीट दिल्याने नाराज भाजप नेते शिवाजी जाधव निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उतरले आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवाजी जाधव यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवाजी जाधवांना फोन करत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. मात्र, यानंतरही शिवाजी जाधव निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. 


समाजकारण करण्यासाठी वकीली सोडून इकडे आलोय


अपक्ष उमेदवार शिवाजी जाधव यांनी एबीपी माझाला याबाबत प्रतिक्रिया देत सांगितलं आहे की, हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा दौरा झालेला आहे. जनतेतून उस्तपूर्त प्रतिसाद मिळतोय. या भागाचा विकास करण्यासाठी राजकारणातून समाजकारण करण्यासाठी दिल्लीची वकीली सोडून इकडे आलोय. सर्वोच्च न्यायालयामध्ये मी 35 वर्ष वकीली केली आणि करतोय, सतत दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची माझी नेहमीच भावना असते, सुप्रीम कोर्टामध्ये सहा वर्ष वकील संघाचा अध्यक्ष होतो, असं त्यांनी सांगितलंय. 


इतर उमेदवारांच्या तुलनेत माझी उमेदवारी सरस


गेली दहा वर्ष माझं जे काम आहे, तरुणांना नोकऱ्या, महाआरोग्य शिबीर, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत, मागील 17 वर्षापासून टोकाई सहकारी साखर कारखाना बंद होता, तो कर्ज काढून कारखाना शेतकऱ्यांसाठी सुरू केला आहे. दोनदा विधानसभा निवडणूक लढवली, फार थोड्या मतांनी मी पराभूत झालोय, सर्वांचा असं मत आहे की, शिवाजी जाधवची कोरी पाटी आहे. यावेळेस संधी दिली पाहिजे. संसदेमध्ये महत्त्वाची कायदे पास केले जात असतात, तिथे माझ्या कायद्याच्या अभ्यासाचा उपयोग किती होऊ शकतो आणि म्हणून इतर उमेदवारांच्या तुलनेत माझी उमेदवारी सरस आहे, म्हणून मला जास्त पाठिंबा मिळतोय, असा विश्वास शिवाजी जाधवांनी व्यक्त केला आहे.


वसमतमध्ये भाजप वाढवला, तिथे पक्षाचं अस्तित्व नव्हतं


कुणाला फटका बसवा म्हणून मी ही निवडणूक लढवत नाही, ही निवडणूक जिंकण्यासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. मी वसमतला भारतीय जनता पक्ष वाढवला, तिथे पक्षाचे अस्तित्व नव्हतं. पंचायत समितीमध्ये एक हाती सत्ता आणली एवढं सगळं करून सुद्धा 2019 ला मला लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही. 2019 ला विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा मला अपक्ष उमेदवारी भरावी लागली आणि तेव्हा तीन ते चार हजार मतांनी पराभूत झालं, असं शिवाजी जाधव यांनी सांगितलं.


शिवाजी जाधवांना मुख्यमंत्र्यांचा फोन


शिवाजी जाधव म्हणाले, आजही माननीय मुख्यमंत्री साहेबांचा मला फोन आला होता. साहेबांचे आणि माझे चांगले संबंध आहेत. मी त्यांचा आदर करतो. महाराष्ट्र-कर्नाटक बॉर्डर डिस्ट्रीब्यूट मध्ये मी महाराष्ट्र सरकारचा वकील आहे. मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा देण्याविषयी मला सांगितलं. मी साहेबांना सांगितलं की, या निवडणुकीमध्ये मी निवडणूक जिंकण्यासाठी उतरलेला आहे आणि आता चार-पाच दिवस मतदानावर राहिले, आता पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही, असं शिवाजी जाधव यांनी स्पष्ट केलं आहे.


Shivajirao Jadhav Hingoli : मुख्यमंत्र्यांचा फोन, तरीही लोकसभा लढण्यावर शिवाजीराव जाधव ठाम