हिंगोली : हेमंत पाटील (Hemant Patil) यांना हिंगोली लोकसभेमध्ये (Hingoli Lok Sabha Election 2024) महायुतीकडून उमेदवारी (Mahayuti Seat Sharing) मिळाल्यानंतर जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारामध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. हेमंत पाटील यांचा फोन बऱ्याच वेळा स्विच ऑफ असतो हे आम्ही  अनेक वेळा अनुभवले. याशिवाय त्यांच्याबद्दल मतदारसंघांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे आताही वेळ आहे. शिवसेनेने हिंगोली लोकसभेसाठी हेमंत पाटील यांना जी उमेदवारी दिली आहे, ती उमेदवारी बदलावी अशी प्रतिक्रिया माजी खासदार आणि भाजप नेते शिवाजी माने (Shivaji Mane) यांनी दिली आहे.


महायुतीत ऑल इज नॉट वेल


शिवाजी माने यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे की, हेमंत पाटलांच्या विषयी आमची नाराजी असण्याचं काहीही कारण नाही, जनतेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये नाराजगी आहे. कार्यकर्त्यांशी यांनी (हेमंत पाटील) कधीही संवाद केलेला नाही, त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांसोबत गेला नाही आणि भाजपच्या कार्यकर्त्यांसोबतही संवाद केला नाही. लोकांमध्ये आणि त्यांच्यामध्ये खूप मोठी दरी निर्माण झाली आहे. तुम्ही चार-पाच गावचा दौरा करून यानंतर तुमच्या लक्ष्यात येईल, लोक तुमच्याबद्दल काय बोलतात, ते कशामुळे एवढी नाराजी झाली, असंही त्यांनी सांगितलं.


हेमंत पाटलांच्या उमेदवारीवर भाजपची नाराजी


शिवाजी माने यांनी सांगितलं की, लोक असा म्हणतात, किती फोन केले, तरी कधीही फोन उचलत नाहीत. त्यांचा फोन बऱ्याचदा स्विच ऑफ असतो, हे आम्ही सुद्धा अनुभवले आहे. त्यामुळे  प्रामुख्याने ही त्यांच्या बाबतीत नाराजगी आहे. ही नाराजगी आम्ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही सांगितली आहे. आजही दोघांनाही मी एसएमएस केला आहे. मुख्यमंत्र्यांना सुद्धा एसएमएस केला आहे, संपर्क नेते आनंद जाधव यांना सुद्धा एसएमएस केला आहे, असंही त्यांनी सांगितलं.


शिवसेनेने उमेदवार बदलावा, दुसरा चेहरा द्या


अजून वेळ गेलेली नाही, तुम्ही तुमचा उमेदवार बदला, जागा भाजपला नका देऊ, दुसरा चेहरा द्या, तरच तुम्हाला फायदा होईल, हे मी कळकळीने बोलतोय. तुम्ही उमेदवार बदला त्यांच्या उमेदवारीच्या बाबतीत प्रचंड नाराजगी आहे. आम्ही उमेदवार कोण सुचवणार, त्यांचा पक्ष वेगळा माझा पक्ष वेगळा, आज बाळासाहेबांची शिवसेना 60-70 वर्षाची आहे, तो पक्ष ते सांभाळत आहेत. त्यांच्याकडे चांगली सुशिक्षित ग्रामीण भागात काम केलेली मंडळी आहेत, असं शिवाजी माने म्हणाले.


उमेदवार बदला किंवा जागा भाजपला द्या


त्यांनी पुढे म्हटलं की, आम्हीही या जागेवर दावा करत होतो, आम्ही या जागेवर यामुळेच दावा करत होतो की, त्यांच्याबद्दल असलेली नाराजी आहे, त्यामुळे याचं रूपांतर विजयामध्ये होत नाही म्हणून आम्ही त्यांच्या (पक्षश्रेष्ठींच्या) नोटीसमध्ये आणून देत होतो की, तुमचा उमेदवार बदला किंवा जागा भाजपला द्या. आम्ही तर पक्षाचे कार्यकर्ते आहोत प्रचार केला काय, नाही केला काय, लोक ठरवणार आहेत. लोकांना मतदान द्यायचे आहे. आज अनेक पक्षांमध्ये हेच होत चालले पक्षप्रमुख ठरवतील. तोच उमेदवार जनतेच्या मनातला उमेदवार द्या. आज टेक्नॉलॉजी एवढी चांगली झाली आहे. 


लोकांच्या मतदारांच्या मनातला उमेदवार द्या


एका सेकंदामध्ये उमेदवार विषयीचे मत कळत आहे, मग तुम्ही उमेदवारी का लादताय, लोकांच्या मतदारांच्या मनातला उमेदवार तुम्ही द्या. शिवसेना आणि काँग्रेसचे आयडोलॉजी कधी मिळाली का, धर्मनिरपेक्षतेवर अवलंबून असणारा काँग्रेस पक्ष आणि धर्मनिरपेक्षतेची टिंगल टवाळी उडवणारे बाळासाहेबांनी केली, मग तुम्ही एकत्र येता कसे विशिष्ट उमेदवाराला मतदान लोकांना करण्यासाठी मजबूर का करतायेत, असा सवाल यावेळी त्यांनी विचारला आहे. 


शिवसेनेने चेहरा बदलून द्यावा


हेमंत पाटलांच्या उमेदवारीबाबत मी नक्कीच नाराज आहे, त्यांच्याबाबत लोकांच्या ज्या प्रतिक्रिया येतात, त्याबाबत मी बोलतोय. हेमंत माझा मित्र आहे, त्याला जिल्हाप्रमुख पदापासून आतापर्यंत आम्ही मदत केली आहे. त्याच्याविषयी द्वेष असण्याचं कारण काय लोकांना बोलून दाखवता येते व्यथा,  मी बोलतोय ही माझी व्यथा नाही, मला उमेदवारी मिळत नाही म्हणून मी त्याच्यावरती टीका-टिप्पणी करतोय असंही नाही. शिवसेनेचे ही जागा आहे, शिवसेनेने चेहरा बदलून द्यावा, त्याची (हेमंत पाटील यांचे) पत्नी किंवा त्याच्या घरात न देता अजून कोणाला द्या जेणेकरून तुम्हाला लोकांमध्ये अट्रॅक्ट होता येईल लोकांमध्ये जाता येईल, असं माने म्हणाले.


आजही वेळ गेलेली नाही चार तारीख शेवटची आहे, एखादा फॉर्म भरून ठेवा, अशा पद्धतीची विनंती आम्ही बैठकीत करणार आहोत, हेमंत पाटलांना पर्याय म्हणून एखादा फॉर्म भरून ठेवणार आहोत नाही, तर जबाबदारी त्यांनी घ्यावी, युतीचा धर्म पाळायला आम्ही तयार आहोत, ग्राउंड लेव्हलची सत्य परिस्थिती काय आहे, हे आम्ही त्यांच्या निदर्शनामध्ये आणून द्यायचा प्रयत्न करतोय, असं शिवाजी माने यांनी स्पष्ट केलं आहे.