Raj Thackeray : राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका लागतील त्यामुळे सज्ज राहा असे आदेश उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना दिले होते. आता उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सुद्धा निवडणुकीचे (Election) संकेत दिले आहेत. राज्यात लवकरच निवडणुका लागतील असं भाकित राज ठाकरे यांनी वर्तवलं आहे. राज ठाकरे यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात लवकरच कोणत्या निवडणुका होणार आहेत, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.


मुंबईतील परळमधल्या कामगार मैदानात मनसेतर्फे कोकण महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाची सांगता काल (13 नोव्हेंबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी जानेवारीपासून बोंबलायचं आहे, निवडणुका लागतील असं म्हटलं.


राज ठाकरे काय म्हणाले?
मी आता भाषणाला उभा नाही. मी सध्या घशाला आराम देतो. कारण जानेवारीपासून बोंबल बोंबल बोंबलायचंच आहे. निवडणुका लागतील. घसा एवढ्यासाठीच बोललो कारण गळा हा लता मंगेशकर वगैरे या लोकांसारखा असतो. घसाच आपला असतो. त्यामुळे घशाला जरा आराम देतोय, असं राज ठाकरे म्हणाले.


मध्यवधी निवडणुकीसाठी तयार राहा : उद्धव ठाकरे
यापूर्वी राज्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संपर्कप्रमुखांची उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली होती. यावेळी बोलताना मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात. त्यामुळे तुम्ही तयारा राहा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यावर सत्ताधारी पक्षाकडून प्रतिक्रिया आल्या होत्या. आमदार फुटू नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुकीचं वक्तव्य केल्याचं आशिष शेलार यांनी एबीपी माझा कट्टा कार्यक्रमात केलं होतं. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी निवडणुका लागतील असं वक्तव्य केलं आहे.


मनसे पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक
दरम्यान पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची आज वांद्रे एमआयजी क्लब इथे बैठक बोलावली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबईतील लोकसभा निहाय परिस्थितीचा राज ठाकरे आढावा घेणार आहेत. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील मनसे पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे या बैठकीत संवाद साधणार आहे. त्याचसोबत 27 नोव्हेंबरला मुंबईत मनसे गट नेत्यांचा जो मेळावा होणार आहे त्याच्या तयारीचाही आढावा घेतला जाणार आहे. मनसेने याआधीच निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे.


संबंधित बातमी


Uddhav thackeray : राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य