जळगाव : शेरोशायरी करत आणि चंद्रकांत पाटील यांच्या एका शब्दावर हजारो लोक काही तासात जमतात, अभिनंदन असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगवात आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासाठी आयोजित मेळाव्यात भाषणाला सुरुवात केली. मुक्ताई ज्याला पावते त्याला पावते, नको त्याला नाश करते. अडीच वर्षात पंधरावेळा मुख्यमंत्री या जिल्ह्यात आले आहेत, यंदाच्या निवडणुकीत लाडक्या बहिणी समोरच्याचा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाहीत, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं (Eknath Shinde) कौतुक केलं. तसेच, पंधराशे रुपये मिळू नये यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत. पण ते शक्य होणार नाही, या पंधराशे रुपयाने मार्केटमध्ये चलन वाढलंय. पंधराशे रुपये माणूस आता घरातील बाईकडे मागत आहे, ही शिंदे साहेबाची कृपा आहे. महिलांसाठी अनेक योजना, आजपर्यंत एवढ्या योजना कोणी आणल्या नसेल. त्यामुळे, शिंदेसाहेब निवडणुकीनंतर काय-काय वाढवतील हे सांगता येत नाही, असेही गुलाबराव पाटील (Gulabrao patil) यांनी म्हटले. तर, चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ हे सुपरमॅन आहेत, अशा शब्दात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. 


मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली. मुक्ताई नगरमध्ये या माणसाने एवढे पैसे आणले, एवढे कधीच आले नाहीत. जळगाव जिल्हा हा महायुतीचा बालेकिल्ला राहिला आहे. चंदूभैय्या गरम माणूस आहे, काम नाही झालं तर माझ्यावर आणि शिंदे साहेबांवर रागवतो असा माणूस आहे. जो आडवा येईल त्याचा सत्यानाश होऊ दे, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी आपले भाषण संपवले. पावननगरी पासून हा मेळावा सुरू होत आहे, या ठिकाणच्या नेत्यांचं गर्वहरण झाल्याशिवाय राहणार नाही. या मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली आहेत, इतिहासात नोंद होईल इतका निधी देण्यात आला, विकासकामे केली म्हणून आज ही जनता याठिकाणी हजर झाली आहे. मी राजकारण मराठी माणसांसाठी करत आलो, अनेकांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, जनतेने मला साथ दिली, त्यामुळे आपण आहोत. मी सेवा करत राहिलो, मी उद्धव ठाकरे यांना शंभर फोन केले, पण त्यांनी भेटायला सांगितले, त्यांनी कामाला लागायला सांगितले. माझ्यावर माझ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले, महायुती असतानाही सेनेचे काम केले म्हणून ते गुन्हे दाखल केले गेले. उद्धव साहेबांनी फोन घेतले नसल्याने मी अपक्ष लढलो, निवडून आलो, असे चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात म्हटले. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुपरमॅन


वर्षावर हजारो लोकं मुख्यमंत्र्यांची भेट घेतात, आणि त्यांचे प्रश्न सुटतात, म्हणून मीही त्यांच्यासोबत गेलो. महिला आणि मुलींसाठी सरकारच्या योजना या महायुतीने आणल्या, त्याचा फायदा सामान्य जनतेला होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुपरमॅन आहेत, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्‍यांवर स्तुतीसुमने उधळली. 


विरोधकांच्या बुडाला फटाके फुटायले


महायुती उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील विजय झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगत एकनाथ शिंदे यांनी आ चंद्रकांत पाटील यांनी युतीच्या तिन्ही पक्षाचे झेंडे त्यांच्या हाती दिले आणि मंत्री गुलाबराव पाटील यांना त्यांच्याकडे लक्ष देण्यास सांगितले. याठिकाणी आपले मोठे स्वागत पाहून आपण भारावलो, येथे गर्दीचा महासागर आहे, लाडक्या बहिणी वीस नोव्हेंबरला काम करतील, दिवाळी आली आहे, विरोधकांच्या बुडाला फटाके फुटायला लागले. 23 तारखेला चंद्रकांत पाटील यांच्या विजयाचे फटाके फुटतील, ते बाळासाहेब यांच्या विचाराचे आहेत, कडवड स्वभावाचे आहेत, माझ्यावर पणं ते रागवतात, त्यांच्या मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा निधी आपण दिला, आपण देणारा मुख्यमंत्री आहे. लाडकी बहीण योजना सुरू करायची म्हटलं तर अनेकांना हा चुनावी जुमला वाटला, मात्र महिलांच्या खात्यावर पैसे आले, आपण एकदा ठरवले तर आपण स्वतःचे पणं ऐकत नाही, महिलांच्या नावावर पैसे आल्याने विरोधक अफवा पसरवू लागले आहेत. बुरी नजर वाले तेरा मुह काला, पैसे परत जातील म्हणून सांगू लागले, आम्ही मात्र नोव्हेंबरचे पैसे ही अगोदरच दिले आहेत. आता समोरच्याचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. काही जणांनी याला कोर्टात नेले, मात्र कोर्टाने त्यांच्या थोबाडीत दिली, आपण आचारसंहिता अगोदर योजना आणली, ही योजना कायम राहणार आहे, त्याचं नियोजन केले आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. 


लाडकी बहीण योजना कधीच


मी गरिबी पहिली आहे, म्हणून मी ठरवले आहे देण्याची वेळ आली तर आपण द्यायचं. कोणी मायका लाल आला तरीही लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, तुम्ही ताकद दिली तर दोन हजार, तीन हजार रुपये देण्यात येतील. देण्याची दानत महायुती सरकारमध्ये आहे, मला बहिणी लखपती झालेल्या पहायचं आहे, असेही एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात म्हटले.