बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी नांदेड जिल्ह्यातील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं यावरुन चर्चा सुरु झाल्या होत्या. बाबासाहेब पाटील यांना बीड मधील आमदार सुरेश धस यांच्यासोबतच्या कार्यक्रमाला माजी मंत्री धंनजय मुंडे गैरहजर राहिल्याबाबत विविध चर्चा सुरू आहेत, असं विचारण्यात आलं होतं. त्याबाबत राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना विचारणा केली असता मुंडे यांच्या प्रकृतीबाबत वक्तव्य केलं होतं. बाबासाहेब पाटील यांच्या या वक्तव्यानंतर बातम्या प्रकाशित होताच धनंजय मुंडे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे.
धनंजय मुंडे यांच्या पोस्टमध्ये काय म्हटलं?
आमचे सहकारी, सहकारमंत्री श्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून मला अर्धांगवायू झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांवर प्रसारित केले जात आहे. मुळात मला बेल्स पाल्सी हा आजार दीड महिन्यांपूर्वी झालेला असून त्याचा परिणाम चेहऱ्यावर झाल्याने अजूनही मला बोलायला त्रास होतो.
श्री बाबासाहेब पाटील यांची व माझी दोन दिवसांपूर्वी एका बैठकीत भेट झाली होती. त्यांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली त्याबद्दल आभार.
मात्र मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून बेल्स पाल्सी आहे व त्याचा व इतर काही वैद्यकीय बाबींचा त्रास अजूनही होतो असून बोलायला त्रास आहे. मात्र नव्याने मला कोणताही आजार झालेला नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले.
महंत नामदेवशास्त्री काय म्हणाले?
नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा देताना काल म्हटलं होतं की, त्यांच्या गालावरून वारे गेले आहे. सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा चांगली वाणी बंद पडली. ती पुन्हा सुरू व्हावी. पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्याकडून घडावं एवढेच बोलू, असेही नामदेव शास्त्री यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे काल पिंपळनेर (ता. शिरूर कासार) येथील संत श्री भगवानबाबा यांच्या परंपरेतील नारळी सप्ताहात हजेरी लावणार होते. मात्र, त्यांना तांत्रिक अडचणींमुळं क्लिअरन्स न मिळाल्यानं त्यांनी बीडचा दौरा रद्द केला होता.