बीड : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे (Sharad Pawar Group) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची युवा संघर्ष यात्रा बीड (Beed) जिल्ह्यात पोहचली आहे. दरम्यान, शेतकरी, तरुण बेरोजगार आणि महिलांचे प्रश्न जाणून घेतल्यानंतर रोहित पवार यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेतली असून, या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केले आहे. मंत्री, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना भाषणाची स्क्रिप्ट फडणवीसांनी लिहून दिली होती. त्यामुळेच मराठा आणि ओबीसी वाद निर्माण झाला असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. 


दरम्यान यावेळी बोलतांना रोहित पवार म्हणाले की, "लोकांमध्ये मराठा आणि ओबीसी असा कोणताही वाद नाही. मात्र, राजकीय नेत्यांकडून हा वाद लावला जात आहे. सर्वसामान्य मराठा किंवा ओबीसी यात सहभागी नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी हा वाद सुरू झाला असून, भुजबळ मोठे नेते असतांना देखील अशाप्रकारे बोलत आहे. तर, भुजबळ यांना भाषणाची स्क्रिप्ट फडणवीसांनी लिहून दिली होती. तसेच, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना फडणवीसांनी ओबीसी सभेला जाण्यापासून रोखलं असावं, असेही रोहित पवार म्हणाले. तर, एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांची ताकत फडणवीस कमी करत आहेत. सोबतच, भाजप भुजबळ यांना संपवण्याचा डाव आखत असल्याचे देखील," पवार म्हणाले. 


ओबीसीचं राजकीय आरक्षण भाजपनेच रोखून धरले आहे


स्थानिक निवडणूका होत नसल्याच्या मुद्यावर बोलतांना रोहित पवार म्हणाले की, "भाजपच्या काही लोकांमुळेच ओबीसीचं राजकीय आरक्षण गेल, तर, बीडमध्ये झालेल्या जाळपोळीत सरकारमधल्या मोठ्या नेत्याचा हात होता. भाजपचे काही लोकं न्यायालयात गेल्यामुळे ओबीसीच राजकीय आरक्षण गेले. त्यामुळे, भाजप यात राजकारण करत आहे. भाजप हे यामध्ये लक्ष विचलित करण्यासाठी राजकारण करत असून, ओबीसी राजकीय आरक्षण भाजपनेच रोखून धरला असल्याचे," पवार म्हणाले. 


मराठवाड्यातील पाण्याची व्यवस्था करावी


मराठवाड्यात सध्या पाण्याचा प्रश्न पेटला असून, सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. बुलेट ट्रेन सारख्या प्रकल्पावर कोट्यावधी रुपये खर्च करण्यापेक्षा, हा प्रकल्प थांबवून मराठवाड्यातील पाण्याची शाश्वत व्यवस्था सरकारने केली पाहिजे. 2015 साली भाजपची सरकार असतांना नर्मदा नदीतलं मराठवाड्याच्या हक्काचं पाणी हे गुजरातला देण्याचे पाप भाजप सरकारने केले. त्यामुळे, ते पाणी परत मराठवाड्याला देण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे. 


निवडणूक आयोग आमच्या बाजूने निकाल देणार नाही...


राष्ट्रवादी पक्षाचे विचार आणि कार्यकर्त्यांसाठी, पदाधिकाऱ्यासाठी आपला पक्ष टिकावा यासाठी स्वतः लढत आहेत. निवडणूक आयोग सध्या ज्या पद्धतीने काम करत आहे. ते पाहून असं वाटतं की, आमच्या बाजूने निकाल लागणार नाही. त्यामुळे, आम्ही आमची बाजू आता कोर्टामध्ये मांडली आहे. पण, कोर्ट सत्तेच्या बाजूने निकाल देईल असं रोहित पवार म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


विजय वडेट्टीवार 'यू टर्न' विरोधी पक्षनेते; त्यांची ओबीसींबद्दलची भूमिकाही संशयास्पद; आशिष देशमुखांची खोचक टीका