Continues below advertisement

Devendra Fadnavis speech BMC Election 2026: देशातील काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्येही अदानी समूहाचे (Adani group) प्रकल्प आहेत. ती राज्यं वेडी आहेत का? हा जमाना असा आहे की, तुम्ही उद्योजकाला नाकारलं, गुंतवणूक नाकारली की तो गुंतवणूकदार दुसरीकडे जायला तयार असतो. गुंतवणूकदारच (Investment) आले नाहीत, तर राज्याचा विकास कसा होणार? तरुणांच्या हाताला रोजगार कसा मिळणार, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थित केला. ते सोमवारी मुंबईच्या शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या सभेत बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अदानींच्या मुद्यावरुन भाजपला लक्ष्य करणाऱ्या ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर दिले.

आपल्या राज्यातील मुलांच्या हाताला काम कसं मिळेल, हे पाहणे ही आमची प्राथमिकता आहे. महाराष्ट्रात गुंतवणूकदार, उद्योजक आलेच नाहीतर तर मुलांच्या हाताला काम कसं मिळेल? तुमचं बरं आहे, फक्त भाषणं करुन तुमचं चालतं. तुम्ही मराठी माणसाला नोकऱ्या दिल्या नाहीत, फक्त शिववडापावची गाडी दिली. वडापाव्यतिरिक्त तुम्ही मराठी माणसासाठी स्वप्नच पाहिलं नाही. पण आमच्या सरकारचं स्वप्न आहे की, मराठी माणसाला नोकऱ्याही देऊ आणि त्याला उद्योजकही बनवू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Continues below advertisement

महाराष्ट्रात एकही मराठी माणूस बेरोजगार राहणार नाही. त्यामुळे अदानी येवो किंवा कोणीही येवो, जो महाराष्ट्रात गुंतवणूक करेल, त्याचं स्वागत आम्ही करु. आम्ही कोणाला गैरफायदा घेऊ देणार नाही. मात्र, राज्यात आलेल्या गुंतवणुकदारांचं स्वागत जरुर करु, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

जर आपली अर्थव्यवस्था विस्तारित होत असेल, आपल्याकडे गुंतवणूक येत असेल तर , आपल्या मुलांच्या हाताला काम मिळत असेल तर आपण त्यांचं स्वागत केले पाहिजे. तुम्हाला चिंता नाही, तुमच्या मुलाबाळांना चिंता नाही, पण मला मुंबईतील सामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबीयांची चिंता आहे. त्यांच्या डोळ्यात स्वप्न आहेत. ती स्वप्नं त्यांना पूर्ण करायची आहेत. ही स्वप्नं पूर्ण करायला त्यांना गुंतवणूक हवी आहे. ती गुंतवणूक त्यांना कोण देणार आहे, हा खरा सवाल आहे. मला फार उत्तरं द्यायची आवश्यकता आहे. मी उत्तरं द्यायला लागलो तर अनेकांना तोंड दाखवायला जागा उरत नाही, असा इशाराही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

आणखी वाचा

गौतम अदानींच्या साम्राज्याचा इतका झपाट्याने विकास का झाला? देवेंद्र फडणवीसांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, म्हणाले...