अहिल्यानगर : अहिल्यानगरमधील शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आणि जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांच्या निवासस्थानी अचानक पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोगाचे पथक धाड टाकल्याने त्यांना धक्का बसला आणि त्यांची प्रकृती बिघडल्याचा आरोप करण्यात आलं आहे. अनिल शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना शहरातील आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. अनिल शिंदे यांच्या पत्नी शीला शिंदे यांनी हा प्रकार मानसिक त्रास देण्यासाठी केला गेल्याचं म्हटलं आहे.
छापा नेमका कशासाठी टाकला होता? त्यात काय आढळले? याबाबत अधिकृत माहिती अजूनही समोर आलेली नाही. मात्र निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या कारवाईने अनिल शिंदे त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर आता शिदेंची शिवसेना आक्रमक झाली असून त्यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत.
अहिल्यानगर महापालिका निवडणूक एकनाथ शिंदेंच्या शिवसेने स्वबळावर लढवली जात आहे. शिवसेना चांगले यश मिळेल या भीतीने आमचे विरोधक मग त्यात आमचे महायुतीतील मित्र पक्षाचा समावेश आहे, त्यांच्या पायाखाली वाळू सरकली आहे म्हणून तर प्रशासनाचा गैर वापर करून आमच्या उमेदवारांवर दबाव टाकत असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
शिवसेना संपर्क प्रमुख संजीव भोर काय म्हणाले?
अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीत आमचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे उमेदवार आहेत. साडे पाचच्यावेळी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येनं छापा टाकला. अगदी किचनपर्यंत उलथापालथ करण्यात आली. मात्र, पोलिसांना काही सापडलं नाही. अचानक प्रशासनानं केलेल्या कारवाईमुळं अनिल शिंदे यांचा बीपी शुट आऊट झाला, त्यामुळं अत्यावस्थ अवस्थेत अनिल शिंदे यांना आनंद ऋषी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अजूनही त्यांची प्रकृती स्थिर नाही.
या घटनेवरुन हे लक्षात येतेय की पोलीस आणि प्रशासन शिवसेनेचे उमेदवार, सर्वसामान्य नागरिकांवर दडपशाही करतंय. विशिष्ट नेत्यांच्या इशाऱ्यावर ही कारवाई केली जातेय. जेव्हापासून शिवसेनेनं अहिल्यानगर नगपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून अनेक प्रभागात उमेदवारांना पत्रकं वाटू दिली जात नाहीत. शिवसेनेनं पुरस्कृत केलेल्या उमेदवारांमागं गुंड पाठवले जातात. पोलीस बघ्याची भूमिका हे सर्व सुरु असताना घेतं. अनिल शिंदे यांच्या घरासमोर दुसऱ्या उमेदवाराचं घर आहे. त्या उमेदवाराच्या घरासमोर दोन चारशे लोकांची गर्दी असताना तिथं चौकशी केली नाही.
प्रशासन पक्षपातीपणे कारभार करतंय. इकडे शिवेसनेच्या उमेदवाराबाबत मात्र पक्षपातीपणानं प्रशासन वागत आहे. प्रशासनानं हे थांबवलं पाहिजे. अहिल्यानगरमध्ये जेव्हा जेव्हा प्रशासनाला हाताशी धरुन दडपशाही करण्याचा प्रकार होतो, तेव्हा मतदार शिवसेनेकडे झुकतो हा अनिल भैय्या राठोडांपासून इतिहास आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे यांना ही माहिती दिली आहे, असं संजीव भोर म्हणाले.
