मुंबई: किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन छत्रपती संभाजीराजे आणि भिडे गुरुजी यांच्यात सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एक महत्त्वाची मागणी केली आहे. मला या वादावर फार बोलायचे नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राजधर्माचे पालन करुन संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांना तुरुंगात टाकावे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मला देवेंद्र फडणवीस यांना एवढंच सांगायचं आहे की, तुम्ही आज राज्याचे मुख्यमंत्री आहात. तुम्ही अटलबिहारी वाजपेयी यांना आठवा. जो कोणी राजदंड हातात घेतो, त्याला राज्य चालवता आलं पाहिजे. जो कोणी कायद्याला मानत नसेल त्याला आतमध्ये तुरुंगात टाकण्याची संधी असली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी भीमा कोरेगावच्या वेळेस संभाजी भिडेंना पाठिशी घातलं, एकप्रकारे बळ दिलं. ती चूक आता पुन्हा करु नका, ही माझी अपेक्षा असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
सौगात-ए-मोदीवरुन प्रकाश आंबेडकरांची टीका
भाजपकडून रमजान ईदच्या मुहूर्तावर देशातील मुस्लीम समुदायाला 32 लाख सौगात-ए-मोदी किट वाटण्यात येणार आहेत. या किटमध्ये खाण्यापिण्याचे पदार्थ आणि कपडे असणार आहेत. यावरुन प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला लक्ष्य केले. इतर पक्ष वाटप करतात आणि भाजप आरएएस करते तेव्हा वेगळा संदर्भ येतो. 1999 पासून सत्तेत आल्यापासून ॲंटी मुस्लिम भूमिकेचा स्टँड राहिलेला आहे. गोध्रा घडवण्यात आलेलं आहे. रेल्वेचे डब्बे जुने घेतले, जळाले नाही आणि आतून जळालेत. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर अखलाक, शाबीर यांचे मॉब लिंचिंग केलं जातं आणि त्याचे व्हीडिओ आपल्याला मिळतात. मुस्लिमांना साईडट्रॅक करायचं, हा भाजप आणि आरएसएसचा प्रयत्न आहे. त्यामुळे सौगात ए मोदी कार्यक्रम येतो तेव्हा शंका येते. हा राजकीयदृष्टीनं केलेला हा कार्यक्रम आहे.
22 टक्के हिंदू बाहेर जाऊ पाहात आहे, अशात मतदार जात असल्याने हे कृत्य केले जात आहे. मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन सुरु आहे. मौलवींनी भूमिका घेतली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे ही किट घ्यायची की नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. कट्टरपंथी हिंदूला विचार करण्याची वेळ आली आहे आपल्याला फसवलं तर नाही ना? असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.
आणखी वाचा