Devedra Fadnavis on Uddhav Thackeray : ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक प्रचारगीत लाँच केलं. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हे प्रचारगीत सार्वजनिक करण्यात आले. धगधगती मशाल पेटू दे, असे या गाण्याचे नाव आहे. प्रचारगीत सार्वजनिक करताच उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिवसैनिकांना ते घराघरात पोहोचवण्याचं आवाहन केलं. मात्र, निवडणूक आयोगाने (Election Commission) पुन्हा एकदा ठाकरेंना घेरलं. प्रचार गीतातील जय भवानी शब्दावरुन निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आणि नोटीस बजावली. या सर्व घडामोडींवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?


उद्धव ठाकरेंना नोटीस बजावल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, एक गोष्ट मी सांगतो. हा उद्धव ठाकरे आणि निवडणूक आयोगामधील प्रश्न आहे. याच्याशी आम्हाला काही देणेघेणं नाही. एवढचं मी म्हणू शकतो की, ज्यांनी हिंदूत्व सोडलय. त्यांनी आपल्या गाण्यात तरी जय भवानी कशाला आणावे, अशा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. उद्धव ठाकरेंचे आमच्याबाबत काही आक्षेप असतील तर निवडणूक आयोगाला बोलावे. आम्हाला काय सांगताय.


एकनाथ खडसेंबाबत काय म्हणाले ?


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकनाथ खडसे नाईलाजास्तव भाजपमध्ये जात आहेत, असं म्हटलं होतं. यावरही देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, याचे उत्तर एकनाथराव खडसे यांनीच द्यावे. त्यांचा इलाज आहे की नाईलाज आहे ? 


निवडणूक आयोगाची नोटीस मिळाल्यानंतर ठाकरे काय म्हणाले?


उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमच्या गीतातील जय भवानी हा शब्द काढणार नाही. जय भवानी , जय शिवाजी ही आमची घोषणा आहे. आम्ही ही हुकूमशाही स्वीकारणार नाही. उद्या हे  जय शिवाजी पण काढायला सांगतील. आम्ही निवडणूक आयोगाविरोधात लढणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द काढला जाणार नाही, असंही ठाकरेंनी स्पष्ट केलं. 


अजित पवार काय म्हणाले?


निवडणूक आयोगाच्या कारवाईवर अजित पवारांनीही भाष्य केलं आहे. अजित पवार म्हणाले, निवडणूक आयोगाला वेगळा अधिकार आहे. त्यावर आम्हाला बोलण्याचाही अधिकार नाही. आयोगाला स्वायत्तता आहे. घटनेनी त्यांना अधिकार दिले आहेत. नोटीस येतात. त्यासंदर्भात आपण त्यांना उत्तर द्यायचे असते. नोटीसला उत्तर दिल्यानंतर ते पुढील उत्तर देतील. कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Ranjeetsinha Naik-Nimbalkar on Madha Loksabha : मोहिते पाटलांनी भाजपला टोपी घातली, आता पीएम मोदी माळशीरसमध्ये सभा घेतील, रणजित निंबाळकरांची माहिती