Devendra Fadnavis on Ajit Pawar, Pune : "हे खरं आहे की, राष्ट्रवादीसोबत आपण खूप संघर्ष केला. त्यामुळे अनेकांना असं वाटलं की, ज्यांच्याशी संघर्ष झाला, त्यांच्याशी सलगी कशी करायची? पण ध्येय ज्यावेळेस स्पष्ट असतं. त्यावेळी ध्येयाकडे जाताना कधी दोन पाऊलं पुढे टाकावे लागतात, तर कधी दोन पाऊलं मागे टाकावे लागतात. कधी तह करावा लागतो, कधी सलगी करावी लागते", असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांचे अधिवेशन पार पडले. यावेळी ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी (Ajit Pawar NCP) युती कशामुळे केली ? याबाबत सविस्तर भाष्य केलं आहे. 


जनता भाजपाच्या पाठीशी उभी होती, परंतु हा लढा फेक नॅरेटीव्ह विरोधात देखील होता


देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत, जनता भाजपाच्या पाठीशी उभी होती. परंतु हा लढा फेक नॅरेटीव्ह विरोधात देखील होता. या निवडणुकीत मिळालेल्या पिछाडीमुळे फेक नॅरेटीव्हशी सामना करण्यासाठी भाजपा सज्ज झाला. या निवडणुकीत 43.6% महायुतीला, तर 43.9% महाविकास आघाडीला मिळाले. हा 'थोडी अधिक मेहनत करण्याची', गरज अधोरेखित करणारा निकाल आहे. संविधानाने दिलेल्या आरक्षणाची सीमा  अटलजी आणि नंतर मोदीजी यांनी वाढवल्यामुळे, देशामध्ये आरक्षण सामान्य माणसाला मिळते आहे. तरी देखील आम्ही निवडून आलो की, 'संविधान बदलणार आणि आरक्षण संपवणार', असा खोटा नॅरेटीव्ह पसरवून विरोधकांनी मते मिळवली. परंतु विरोधकांचा हा विजय 'एखाद्या फुग्या सारखा', कार्यकर्त्याने टाचणी लावली तरी हा फुगा फुटेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 


फक्त हीट विकेट होऊ नका वा सेल्फ गोल करू नका


विधान परिषदेच्या निवडणुकीपासून हा फुगा फुटायला सुरुवात झाली. खोट्याला खर्‍याने उत्तर देण्यासाठी, विचार करावा लागत नाही. यावेळी कार्यकर्त्यांना, 'फेक नॅरेटीव्हला उत्तर देण्यासाठी, आदेशाची वाट पाहू नका, मैदानात उतरा, फक्त हीट विकेट होऊ नका वा सेल्फ गोल करू नका. आदेश विचारू नका, मैदानात उतरून ठोकून काढा' असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 


'फेक नॅरेटीव्ह' हाच आजचा रावण आहे


पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजपाचे हिंदुत्व हे व्यापक हिंदुत्व आहे. हिंदुत्व म्हणजेच सहिष्णुता आहे. परंतु हल्ली हिंदूंना दहशतवादी म्हटले जात आहे, विशालगडावरील घटनेत शिवप्रेमींना दहशतवादी म्हटले गेले. तर राहुल गांधींनी हिंदूंना हिंसक म्हटले. आताही आपण जागे झालो नाहीत, तर उद्या जागे होण्याची संधी मिळणार नाही. 'फेक नॅरेटीव्ह' हाच आजचा रावण आहे, त्याचा अंत करून महायुती पुन्हा सत्तेत येईल. या अधिवेशनामार्फत आव्हानांना उत्तर देणारा कार्यकर्ता निर्माण करण्याचा हेतू आहे. या पक्षात 90% कार्यकर्ते जाणतात, आम्हाला जीवनात काहीच मिळणार नाही, परंतु ते काम करत राहतात कारण ते व्यक्तीसाठी नाही विचारांसाठी काम करतात, असंही फडणवीस यांनी सांगितले. 





इतर महत्वाच्या बातम्या 


Dhananjay Munde on Ajit Pawar : माझे खरे गुरू अजित पवारच, तर गोपीनाथ मुंडेंबाबत काय म्हणाले धनंजय मुंडे?