पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आपल्या रोखठोक शैलीमुळे ओळखले जातात. कामात रोखठोक आणि परखड स्वभाव असल्यानेच प्रशासनात त्यांचा दरारा आहे. त्यामुळेच, भाषणातही त्यांची तुफान फटकेबाजी होत असते, अनेकदा आपल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना ते व्यासपीठावरुनच सुनावतात. पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी राज्य सरकारने राबवविलेल्या विविध योजनांची माहिती दिली. त्यामध्ये, लाडकी बहीण योजना, महिलांसाठी 3 सिलेंडर मोफत, मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत तसेच विविध घटकांसाठी आणि सर्वच जाती-धर्मासाठी आपलं सरकार योजना राबवत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं. यावेळी, मुलींच्या मोफत शिक्षणाच्या योजनेबद्दल भाष्य करताना उपमुख्यमंत्र्‍यांनी शिक्षण (Education) संस्थाचालकांना सज्जड दमच दिला. 


राज्य सरकारने मागास आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार अतिमागास प्रवर्ग(EBC), आर्थिक दुर्बल घटक (EWS), सामाजिक आणि आर्थिक मागास (SEBC) आणि ओबीसी (OBC) प्रवर्गात पात्र ठरणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींकडून महाविद्यालयात प्रवेशाच्यावेळी आकारण्यात येणारे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आले आहे. संबंधित प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक संस्थांनी हे शुल्क आकारु नये, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून यासंदर्भात शासन परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. मात्र, काही संस्थांकडून ह्या योजना राबवताना सरकारचे पैसे कधी मिळणार, असे म्हणत पालकांना त्रास दिला जातो, त्यावरुन अजित पवारांनी शिक्षण संस्थाचालकांना इशाराच दिला आहे.


आम्हाला फार कठोर व्हायला संस्थांनी लावू नये, काही काही संस्था नाही, मला आत्ताच पैसे पाहिजेत असं म्हणतात. का, सरकारवर विश्वास नाही काय, आणि मग सरकारने सरळच करायचं ठरवलं तर मग संस्था राहिल का, असा सज्जड दमच अजित पवारांनी शिक्षणसंस्था चालकांना दिला. तसेच, माणूस स्वभाव आहे, कुठं ना कुठं चुकतं. आम्ही देखील संस्था चालवतो, पुणे जिल्ह्यातील शिक्षण संस्थेत मी आहे, रयत शिक्षण संस्थेत मी आहे, शारदा प्रतिष्ठानमध्ये मी आहे. अनेक संस्था चालवतो, इथं असलेले अनेकजण संस्था चालवतात. कधीतरी काहीतरी राहतं, पण आपण ते समजून घ्यायचं असतं. त्यामुळेच, आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी आपण ही योजना आणली आहे, असेही अजित पवार यांनी म्हटले.



पुन्हा महायुतीला निवडून द्या


दरम्यान, दूध,गॅस,लाडकी बहीण यांसह राज्य सरकारच्या इतर सर्व योजना आहेत. सरकार यावर आता 75 हजार कोटी खर्च करत आहे. अजित दादाचा वादा वाद्याचा पक्का आहे,पण हे सगळ हवं असेल,या योजना हव्या असतील तर परत महायुतीला निवडून द्या,काम कसं करून घ्यायचे मी बघतो, असेही अजित पवारांनी म्हटले. 


हेही वाचा


पुण्यात बस ड्रायव्हर अन् पोलीस शिपायात जुंपली, व्हिडिओ व्हायरल होताच उपरती; 3 हजारांत मिटलं


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI