मुंबई: आपली लढाई ही तीन पक्षांविरोधात नव्हती, त्यांनी तयार केलेल्या नॅरेटिव्हविरोधात होती, त्यामुळे राजकीय गणितात आपण कमी पडलो असं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. विशेषत: मराठवाड्यातील निकालाचं मला आश्चर्य वाटतं, मराठा समाजामध्ये केलेल्या नॅरेटिव्हमुळे ज्यांनी 1980 पासून मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्याच पारड्यात मतं गेली असंही ते म्हणाले.


लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची महत्त्वपूर्ण बैठक भाजपच्या दादर येथील वसंतस्मृती पक्ष कार्यालयात झाली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनचा प्रस्ताव आजच्या बैठकीत मांडण्यात आला. तसेच राज्यातील विधानसभा मतदारसंघातील कामगिरीचा आढावा यावेळी घेतला गेला.


मराठ्यांना दोन्ही वेळा आपण आरक्षण दिलं


मराठवाड्याच्या निकालाचं मला आश्चर्य वाटलं असं सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठवाड्यातील मराठा समाजामध्ये विरोधी पक्षाकडून नॅरेटिव्ह तयार केला गेला. मराठा समाजाला दोन्ही वेळा आपण आरक्षण दिलं. सारथी संस्था, फी सवलत, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामडंळ, हॉस्टेल योजना या सगळ्या गोष्टी आपल्या काळात झाल्या. असं असलं तरीही ज्यांनी 1980 पासून मराठा आरक्षणला विरोध केला, त्यांच्यात पारड्यात हे मतदान गेलं. पण हे नॅरेटिव्ह जास्त काळ टिकणार नाही,  हा बुद्धिभेद टिकणार नाही. नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला, तो काही प्रमाणात यशस्वी झाला. पण मोठ्या प्रमाणात झाला नाही. असं झालं असतं तर भाजपला 44 टक्के मतं मिळाली नसती. 2019 च्या मतांशी आपण तुलना केली आपली प्रत्यक्षात मतं वाढली. टक्केवारीचा विचार केला तर एका टक्क्याने मतं कमी झाले आहेत. 


राज्यातले उद्योग पळवले असा नरेटीव्ह विरोधकांनी पसरवला. पण उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्रात गुंतवणुकीत खाली होता. त्यानंतरही रोज खोटं बोलत होते की उद्योग पळवले असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. 


ठाकरेंना मुंबईत विशिष्ठ समाजाची मतं


उद्धव ठाकरेंना मुंबईत मराठी माणसाने मतदान केलं नाही, त्यांना विशिष्ट समाजाने मतदान केलं असं सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंना सहानुभूती होती तर कोकणात का दिसली नाही? कोकणात ठाकरे गटाला एकही जागा मिळणार नाही. पालघर, रत्नागिरी, ठाण्यात त्यांना एकही जागा नाही. यांना मुंबईत कुणामुळे जागा मिळाल्या हे सर्वांना माहिती आहे. यांना मुंबईत मराठी माणसांनी मतदान केले नाही, तर विशिष्ट समाजाच्या मतांवर यांनी निवडणूक जिंकली. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात देखील त्यांना जास्त लीड घेता आले नाही. 


महाविकास आघाडीला फक्त दोन लाख मतं जास्त


महाराष्ट्रातील पॉलिटिकल अर्थमॅटीकमुळे आपण कमी पडलो असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी आकडेवारी सांगितली. ते म्हणाले की, माविआला राज्यात 43.9 टक्के मतं तर महायुतीला 43.6 टक्के मतं मिळाली. परिणामी त्यांचे जास्त उमेदवार निवडून आले. राज्यात  माविआला 2 कोटी 50 लाख तर महायुतीला 2 कोटी 48 लाख मतदान मिळाले. महाविकास आघाडीला केवळ 2 लाख मतदान जास्त आहे. मुंबईत त्यांना 24 लाख तर आपल्याला 26 लाख मतं मिळाली. खोटा नॅरेटिव्हला आपण रोखण्याची तयारी आपण केली. संविधान बदलणार हा विषय इतका खालपर्यंत गेला की पहिल्या तीन टप्प्यात जागा कमी झाल्या. 


ही बातमी वाचा: