Arvind Kejriwal Mumbai Visit : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर (Mumbai Visit) आहेत. अरविंद केजरीवाल आज (23 मे) संध्याकाळी सात वाजेपर्यंत मुंबईत दाखल होणार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यासमवेत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान, खासदार संजय सिंह आणि खासदार राघव चढ्ढा देखील मुंबईत दाखल होणार आहेत. 


उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार केजरीवाल


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांची आज भेट घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल संध्याकाळी मुंबईत दाखल होतील. मुंबई भेटीत अरविंद केजरीवाल उद्या (24 मे) ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहेत. तर 25 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. याआधी केंद्राच्या अध्यादेशासंदर्भात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांची देखील केजरीवाल यांनी भेट घेतली होती.


केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात केजरीवालांची मोहीम


दिल्लीमध्ये अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगमध्ये राज्य सरकारलाही वाव देणारा आदेश सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं 11 मे रोजी दिला होता. पण केंद्र सरकारने अवघ्या आठ दिवसात अध्यादेश आणत हा निकालच रद्दबातल केला. दिल्ली हे पूर्ण राज्य नाही. त्यामुळे इथे केंद्रच सुप्रीम असलं पाहिजे असं म्हणत या अध्यादेशात सगळे अधिकार पुन्हा उपराज्यपालांकडे दिले आहेत. त्यामुळे या अध्यादेशाचं पुढे काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.  हाच केंद्र सरकारचा अध्यादेश राज्यसभेत रोखण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी मोहीम राबवली आहे. त्यासंदर्भात अरविंद केजरीवाल विरोधी पक्षातील नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत.


मोदी सरकारचा अध्यादेश राज्यसभेत अडवला जाऊ शकतो? 


कुठलाही अध्यादेश काढल्यानंतर तो सहा महिन्यांत संसदेत मंजूर करुन घ्यावा लागतो. आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हा अध्यादेश मंजुरीसाठी आलाच तर काय होईल? लोकसभेत तर भाजपला स्पष्ट बहुमत आहे. पण राज्यसभेत खरोखरच भाजपची परीक्षा होणार का? आकडेवारी काय सांगते जाणून घेऊया



  • राज्यसभेची एकूण क्षमता 245, सध्या 7 नामनिर्देशित जागा रिक्त त्यामुळे ही संख्या 238

  • बहुमतासाठीचा आकडा बनतो 120

  • भाजपकडे सध्या राज्यसभेत 93 खासदार आहेत..म्हणजे बहुमतापेक्षा 27 कमी

  • राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार 5 आहेत, त्यांनी भाजपच्या बाजूनं मतदान केलं तर हा आकडा 98 वर पोहचतो

  • शिवाय एआयडीएमके, आसाम गण परिषद या मित्रपक्षांचे अनुक्रमे 4 आणि 1 खासदार आहेत. त्यामुळे हा आकडा 103 वर जाऊ शकतो

  • सोबत बिजू जनता दल 9, वायएसआर 9 हे 18 खासदार मोदी सरकारच्या मदतीला येऊ शकतात. त्यामुळे 121 हा बहुमताचा आकडा पार होऊ शकतो. याशिवाय 3 अपक्षही भाजप सोबतीला आणू शकतं