Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांचा अर्ज भरताना G23 गटाच्या महत्वाच्या नेत्यांनी उपस्थिती लावली आणि चर्चा सुरु झाली...G23 गटाचा विरोध मावळला का? खरगेंच्या अध्यक्षपदाला तर या नेत्यांचं समर्थन आहे. पण नव्या अध्यक्षांना मोकळीक दिली नाही तर आवाज उठवत राहू असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी 'एबीपी माझा'च्या खास मुलाखतीत दिला आहे. 


"नव्या काँग्रेस अध्यक्षांना काम करण्याची मोकळीक मिळावी. ती मिळत राहील असा आशावाद आम्ही व्यक्त करत आहोत..पण तसं झालं नाही तर आम्हाला आवाज उठवत राहावा लागेल," असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या हालचाली सुरु असतानाच एबीपी माझाला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी अनेक महत्त्वाची वक्तव्ये केली आहेत.


आम्ही पक्षाच्या हितासाठीच काम करतोय : पृथ्वीराज चव्हाण
"G23 गट म्हणत आम्हाला बंडखोर ठरवण्याचा प्रयत्न झाला. पण आम्ही हे पक्षाच्या हितासाठी करत होतो. आम्ही आवाज उठवल्यानंतरच पक्षाची चिंतन बैठक इतक्या वर्षांनी झाली. आताही निवडणुकीने अध्यक्ष ठरतोय," असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणतात.


निवडणुका असलेली राज्यं वगळायला नको होती, भारत जोडो यात्रेवर चव्हाणांचं मत
एकीकडे पक्षासाठी या गोष्टी चांगल्या होत असतानाच सध्याच्या भारत जोडो यात्रेवर मात्र त्यांचं वेगळं मत आहे. यात्रेचा मार्ग ठरवताना निवडणुका असलेली राज्यं वगळायला नको होती. त्याने चुकीचा संदेश जात असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. 


भूकंप होणार असल्याच्या चर्चांवर पृथ्वीराज चव्हाण म्हणतात...
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लवकरच भूकंप होणार असल्याची चर्चा आहे. त्याबाबत विचारल्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "भूकंपाविषयी खूप दिवसांपासून मीडियामध्ये चर्चा सुरु आहे. पण तो काही झालेला नाही. भारत जोडो यात्रा मध्य महाराष्ट्रातून जातेय. महाराष्ट्राच्या सगळ्याच भागातून गेली असती तर चांगलं झालं असतं. किती फायदा होईल याचा भविष्यातच त्याचा उलगड होईल. कोणी जातंय म्हणून त्याला थांबवायचं कारण नाही. त्याला जो निर्णय घ्यायचा असेल तो घेईल. भाजपला सध्या सुप्रीम कोर्टातील अस्थिर परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यांना मंत्रिमंडळाचा विस्तारही करता येत नाही. हे सरकार कसं चाललंय ते आपण पाहतोय. ज्या प्रक्रियेतून हे सरकार निर्माण झालेलं आहे ती लोकांना आवडलेली नाही. त्यामुळे त्यांना सरकार चालवताना अडथळे येत आहेत."
 
काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक तर होत आहे. पण पक्षाच्या कार्यशैलीवर, हायकमांड कल्चरवर जे आरोप होतात. त्यातून बाहेर पडण्यासाठी काही बदल नव्या अध्यक्षांच्या कार्यकाळात दिसणार का हे पाहणंही महत्त्वाचं असेल.


Congress Presidential Election : Prithviraj Chavan काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर Exclusive