मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या असून राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. त्यातच, लोकसभा निवडणुकांच्या (Election) निकालातील अपयशानंतर महायुतीने खास रणनिती आखायला सुरुवात केली असून विधानसभा निवडणुकीत फेक नेरेटीव्हविरुद्ध महायुतीचा लढा असणार आहे. दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. त्यातच, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) अचानक दिल्ली दौरा ठरल असून आज मध्यरात्रीच ते राजधानी दिल्लीत पोहोचणार आहे. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही मराठवाड्यातील भाजप आमदारांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे, राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्याचं दिसून येत आहे.  


राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला असून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता विधानसभा निवडणुकांना अवघे 3 महिने राहिले असतानाही मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याने मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची गोची झाली आहे. त्यातच, विधानसभा निवडणुकांना कसं सामोरे जायचं याची रणनीती सर्वच राजकीय पक्षांकडून आखली जात आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीचा झालेला पराभव विधानसभेला भरुन काढण्याचं आव्हान महायुतीतील पक्षांना आहे. त्यातच, मराठा आरक्षणाचा मुद्दा कळीचा बनला असून उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी सत्ताधारी पक्षांविरुद्ध रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे, फेक नेरेटीव्ह आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी महायुती प्रयत्नशील आहे.  


लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठवाड्यात मोठा फटका बसला असून मराठवाड्यातील 8 खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले आहेत. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकांसाठी ही चिंतेची बाब असल्याचे लक्षात घेऊन भाजपकडून आढावा घेतला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील आमदारांची बैठक सागर बंगल्यावर बोलवल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला, मराठवाड्यात आलेल्या अपयशानंतर देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आले आहेत. मराठवाड्यातील विधानसभेच्या भाजपाच्या आमदारांची उद्या सायंकाळी सागर निवासस्थानी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे. कोणकोणत्या कारणामुळे लोकसभेला मराठवाड्यात भाजपाला अर्थात महायुतीला फटका बसला या संदर्भात या बैठीकत विचार मंथन होणार असल्याचे समजते. 


मुख्यमंत्री अचानक दिल्ली दौऱ्यावर


दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा अचानक कोणत्या कारणासाठी नियोजित केला आहे, यावरही तर्कवितर्क लावले जात आहेत. राज्यातील रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार हे कारण तर नाही ना, अशीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यासाठी, मुख्यमंत्री शिंदे रात्री आज रात्री दिल्लीत जाणार असून हा दौरा अचानक ठरला असल्याची माहिती आहे. महत्त्वाच्या बैठकीसाठी दिल्ली दौरा नियोजित करण्यात आल्याचेही सुत्रांनी सांगितले. 


हेही वाचा


उजनी धरण भरलं हो, 40 हजार क्युसेकचा विसर्ग; पंढरपूरसह काही गावांना पुराचा धोका, 500 जणांना हलवलं