मुंबई : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2024) सादर केला. विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडला. यावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीदेखील अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याचे भुजबळांनी म्हटले आहे.  


छगन भुजबळ म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीजबिलाचा भार उचलण्याचे शासनाने राज्यातील 44 लाख 6 हजार शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णत: मोफत वीज पुरविण्याचा तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्पात राज्यातील शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक, महिला या सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प असून यातून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.  


आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा


छगन भुजबळ पुढे म्हणाले की, राज्याच्या अर्थसंकल्पातून शेती, उद्योग, शिक्षण, व्यापार, आरोग्य, पर्यटन अशा विविध क्षेत्रांच्या विकासाला बळ मिळालं आहे. ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना चालू वर्षापासून अभियांत्रिकी, वस्तुशास्त्र, फार्मसी, मेडीकल, शेतीविषयक सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती मिळणार असल्याने राज्यातील ओबीसी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील दहा लाख युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण आणि दरमहा दहा हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन देणाऱ्या ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना’,अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती यामुळे विद्यार्थी वर्गासाठी अतिशय महत्वपूर्ण असा हा अर्थसंकल्प आहे.


महिला अधिक सक्षम होण्यास मदत होणार


‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना’, लघुउद्योजक महिलांना 15 लाख कर्जापर्यंतच्या व्याजाचा परतावा योजना या योजनांमुळे राज्यातील महिला अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. राज्यातील 52 लाख कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.


आणखी वाचा


Maharashtra Budget : हा थापांचा नाही तर मायबापांचा अर्थसंकल्प, जे आश्वासन दिले ते वेळेत पूर्ण करू; देवेंद्र फडणवीसांचा शब्द