Nagpur: राज्यात ज्या ठिकाणी कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीचे पालकमंत्री आहेत. त्या सर्वठिकाणी शिवसेना आमदारांची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यांच्या मतदार संघात जाऊन महाविकास आघाडीचे नेते कार्यक्रम घेतात. यावेळी संबंधीत आमदार किंवा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विचारण्यात येत नाही, असा टोला भाजप नेते आणि राज्याचे माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बानवकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सरकारला लागावला आहे.


शिवसेना समर्थक आमदार आशिष जयस्वाल यांनी सोमवारी महाविकास आघाडीतील आमदारांवर गंभीर आरोप केले. निधी वाटप करताना महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्री मोबदल्याची आणि हिस्सेदारीची अपेक्षा ठेवतात का? या प्रश्नावर शिवसेना समर्थक आमदार आशिष जयस्वाल यांनी गंभीर आरोप केला आहे. या संदर्भात मला असेच अनुभव आले आहेत आणि अनेक आमदारांना असेच अनुभव आलेले आहेत. हे अनुभव मी मुख्यमंत्र्यांना सांगणार असून जर त्यानंतरही बदल झाले नाही तर आम्ही वेगळा विचार करु, असे आमदार आशिष जयस्वाल म्हणाले होते.


यावर प्रतिक्रीया देतांना बावनकुळे म्हणाले. पुढे बावनकुळे म्हणाले, ' कितीही आंदोलने केली तरी या महाविकास आघाडी सरकारला काहीच फरक पडत नाही. सरकारच्या निष्क्रीयतेमुळे राज्यातील विकासाची चाके थांबली आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. आपल्या अजब धोरणांमुळे सरकार राज्यातील जनतेला वेठीस धरत असल्याचा आरोप त्यांनी केला.'


काय म्हणाले होते जयस्वाल?


काही मंत्री चांगल्या पद्धतीने आमची कामे करतात. मात्र, काही मंत्री आमदारांच्या मतदारसंघात निधी देत नाही. निधी देताना तो आमदाराला न विचारता तिथल्या इतर पक्षीय लोकांच्या हाती देतात. हे कोणत्याही आमदाराला सहन होणार नाही आणि मी स्वतः कधीही सहन करणार नाही. जे मंत्री चांगलं काम करतात, आमदारांच्या अडचणी समजून घेत त्यांचा सन्मान करतात त्यांच्याविरोधात मी बोलणार नाही. अजित पवार, राजेश टोपे, एकनाथ शिंदे असेच मंत्री आहेत. मात्र काही मंत्री तसे वागत नाही त्यामंत्र्यांबद्दल सध्या बोलणे योग्य वाटत नाही. कारण निवडणुकीपूर्व तसे बोलणे योग्य होणार नाही. मात्र, 20 तारखेनंतर त्या मंत्र्यांची पोल-खोल नक्कीच करणार असा इशारा जयस्वाल यांनी दिला होता.