Mahayuti Seat Sharing Vidhansabha Election मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठी जंगी तयारी केली जात आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीत (Mahayuti) सध्या जागा वाटपावर चर्चा सुरु आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. 


आगामी विधानसभेसाठी महायुतीमध्ये (Mahayuti) जागावाटप करताना भाजप 155 पेक्षा जास्त जागांबद्दल ठाम असल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीत भाजप 155 पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा लढणार आहे. तर शिवसेना शिंदे गटाला 60 पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच जागावाटपात भाजपने स्ट्रेटजी बनवत काही अटी ठेवल्या जाणार आहेत. 


जागा वाटपात भाजपच्या अटी काय? (Mahayuti Seat Sharing)


मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेच्या त्यांचे आमदार असलेल्या जागांच्या व्यतिरिक्त जास्त जागांच्या मागणीबद्दल संबंधीत मतदारसंघात जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार कोणते? याबाबात भाजपकडून विचारणा केली जाणार असल्याची माहिती भाजपमधील सुत्रांनी दिली. "सीटिंग आमदार असलेल्या जागा व्यतिरिक्त जागा हवी असल्यास जिंकण्याची क्षमता असलेला उमेदवार सांगा मगच मतदारसंघ घ्या", अशी विचारणा करण्याची भाजपची स्ट्रेटेजी असणार आहे. 


आठवडाभरात भाजपची पहिली यादी जाहीर होणार-


आठवडाभरात भाजपची पहिली यादी जाहीर होणार आहे. विधानसभेच्या उमेदवार निश्चितीसाठी पुढील दोन दिवस भाजपच्या महत्त्वाच्या बैठका होणार आहे. भाजपची उमेदवार निवड प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असल्याची माहिती मिळत आहे. काल रात्री सागर बंगल्यावर भाजपच्या निवडक नेत्यांची मॅरेथॉन बैठक पार पडली.  मुंबई, कोकण विभागानंतर आज उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्हा निहाय बैठका तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या बैठकही 2 दिवसांत होणार आहे. 


हरियाणाच्या निकालानंतर भाजपची स्टाईल बदलली-


हरियाणात सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा पराक्रम करुन भाजपने अजूनही आपली ताकद कायम असल्याचे दाखवून दिले आहे. तसेच हरियाणाच्या निकालानंतर महाराष्ट्र भाजपची स्टाईल देखील बदलल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात शरद पवार यांनी महायुतीतील नेत्यांना गळाला लावण्याचा सपाटा लावला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्याबाबतही सहानुभूतीचा फॅक्टर अजूनही कायम असल्याची चर्चा आहे. याशिवाय, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण आणि शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर महायुती सरकार काहीसे बॅकफूटवर गेले होते. लाडकी बहीणसारखी लोकप्रिय योजना सुरु करुनही विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि महायुतीला अपेक्षित असलेला बुस्टर मिळत नव्हता. त्यामुळे भाजप आणि महायुतीचे नेते काहीसे चिंतेत होते. या पार्श्वभूमीवर हरियाणा विधानसभेचा निकाल हा महायुतीचा हुरुप, आत्मविश्वास वाढवणारा ठरु शकतो. 


विधानसभेत होणार जंगी लढत- (Maharashtra VidhanSabha Election 2024)


आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांमध्ये तगडी फाईट होणार असल्याचे बोलले जात आहे. कारण महायुतीतील तीन पक्ष आणि महाविकास आघाडीतील 3 पक्ष आमने-सामने असणार आहेत. शिवाय, शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्याने अनेक विधानसभा मतदारसंघातील प्रतिस्पर्धी एकाच आघाडीत आहेत. त्यामुळे अनेक पक्षांमध्ये बंडखोर उभे राहण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर मतदारांसमोर बच्चू कडू, राजू शेट्टी आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या तिसऱ्या आघाडीचा पर्यायही असणार आहे. तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांकडून मनोज जरांगे पाटील यांना सोबत घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिवाय, मनोज जरांगे पाटील कोणता निर्णय घेणार याकडे हे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. 


संबंधित बातमी:


सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल