Sudhir Mungantiwar: सत्तेच्या स्वार्थासाठी समाजात विष कालावण्याचं काम उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात झालं. देशभावनेसाठी काम केलं पाहिजे. समाजात आम्ही जातीसाठी काम करत नाही. समाजात उद्रेक होता कामा नये, जातीचं राजकारण कायम विरोधकांनी केलं, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली. कुठेही अशांतता असू नये...देशविरोधी शक्तींना याचा फायदा होऊ नये. मणिपूरमध्ये सात दशकांपासून हे होतंय. सरकार यावर लक्ष देऊन आहे, असंही सुधीर मुनगंटीवर यांनी सांगितले.


मुख्यमंत्री, दोन्ही उपुख्यमंत्री एकत्र बसणार आहेत. जे विश्लेषण केले त्यावर हे तिन्ही नेते चर्चा करतील. त्यानंतर विधानसभेची तयारी करतील. आमची देखील कोअर टीम विश्लेषण करेल, मी देखील काही मुद्दे लिहून ठेवले आहे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. जशी आम्हाला कमी मते असतील तसे काँग्रेस सोबत देखील झाले असावे...भाजपला खरच अनुसूचित मते कमी मिळाली का हे बघावे लागेल, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. 


काही राज्यात आम्ही मागे पडलो-


अद्याप एकत्रितपणे विश्लेषण केलं नाही. आम्ही तिन्ही पक्षांनी वेगवेगळी चर्चा केली. कुणा एकट्यावर जबाबदारी टाकण्याचं काम नाही. जबाबदारी सामूहिक आहे. काही राज्यात आम्ही मागे पडलो हे मान्य असल्याचं सुधीर मुनगंटीवर यांनी सांगितले. 


राज ठाकरेंवर काय म्हणाले?


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा दिल्लीत रविवारी पार पडला. या सोहळ्यानंतर 71 खासदारांना कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. या सोहळ्याला राज ठाकरेंना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. यावरुन आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. सुधीर मुनंटीवार यांनीही यावर भाष्य केलं आहे. राज ठाकरेंना निमंत्रण नव्हतं, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितले. हे वरिष्ठांच्या कानावर टाकलं जाईल. घाईगडबडीत निमंत्रण देण्याचं राहिलं असेल, अजून कोणतही कारण नाही. काहींना निमंत्रण जात नाही, मात्र याची नोंद केंद्रीय पक्षाने घेतली पाहिजे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 


मंत्रिमंडळ विस्तारावर मिश्किल प्रतिक्रिया-


केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) मंत्र्यांचा शपथविधी संपन्न झाल्यानंतर आता महाराष्ट्रात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) होणार असल्याची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या 27 जूनपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडेल, अशी माहिती आहे. पत्रकारांनी यावर देखील सुधीर मुनगंटीवार यांना प्रश्न विचारला. यावर जेव्हा चंद्रावर वस्ती होईल, तेव्हा होईल. माध्यमांनी दहावेळा विस्तार केला आहे, अशी मिश्किल प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवर यांनी दिली.