मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील गिरगाव आणि घाटकोपर परिसरात घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मराठी माणसाला डावलणाऱ्यांना मत देऊ नका, असे आवाहन केले होते. मराठी "not welcome" म्हणणार्‍या आणि मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका, असे रेणुका शहाणे यांनी म्हटले होते. रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांनी यासंदर्भात सोशल मीडियावरुन केलेल्या पोस्टची चांगलीच चर्चा रंगली होती. या सगळ्या वादात आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उडी घेतली आहे. त्यांनी रेणुका शहाणे यांना जाहीर पत्र लिहून काही सवाल विचारले आहेत.


चित्रा वाघ यांनी रेणुका शहाणे यांच्या भूमिकेचे कौतुक केले असले तरी त्यांनी हा मुद्दा आता उचलून धरण्याच्या टायमिंगवर चित्रा वाघ यांनी शंका व्यक्त केली आहे. यामागे राजकीय हेतू तर नाही ना?, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. चित्रा वाघ यांनी रेणुका शहाणे यांना लिहलेले हे जाहीर पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


चित्रा वाघ यांनी आपल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय?


मा.रेणुकाताई शहाणे, 


जय महाराष्ट्र  आम्ही सर्व आपले खुप मोठे चाहते आहोत, ‘सुरभी’ या कार्यक्रमातून आपण अखंड भारताच्या विविध भाषा,परंपरा, खाद्यसंस्कृती, वेशभूषा याचे घरबसल्या भ्रमण करविले आणि दर्शन घडवले. त्याचा आम्हाला अभिमान व कौतुकच आहे.


भारतीय  विविधतेला एका माळेत गुंफवून ठेवणारा धागा ‘राष्ट्रीयत्वाचा’ आहे, मला खात्री आहे, याची आपल्याला जाणिव असेलच. मराठी भाषा ही सदैव आमची मायबोली आहे. तीचा मान व सन्मान राखणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. 


आपण ट्विटमधून मराठी मतदारांना केलेल्या आवाहनाचं टायमिंग पाहता यामागील आपला राजकीय हेतू आहे का? हा संशोधनाचा विषय असू शकतो. असो, तसेच जर एखादा व्यक्ती मराठी असल्यामुळे त्याला घर व नोकरी नाकारली जात असेल तर त्याचा मी निषेधच करते. 


पण मी आपणास विचारू इच्छिते की, आपण घाटकोपरमधील सोसायटीमधे स्वत: खात्री केली होती का? कारण माझ्या माहितीस्तव त्या सोसायटीत समान संख्येने मराठी परिवारही गुण्यागोविंदाने नांदतात. 


मी परत सांगते, मराठी भाषेचा आदर केला पाहिजेच पण तिचा वापर फक्त राजकीय हेतुकरिता होता कामा नये. भाषा ही लोकांना जोडते. ती मराठी असो की राष्ट्रभाषा असो. हे तुमच्यापेक्षा कोण चांगल्या पद्धतीने सांगू शकते. कारण आपण जीवनसाथी निवडताना दुसऱ्या भाषेचा आदरच केला आहे. 


आपणास एक प्रश्न विचारते की  कोविडमधे पिपिई किट्स,बॉडी बॅग्स,मास्क,औषधे यात टक्केवारी खाल्ली आणि मराठी माणूस ऑक्सिजन अभावी मरत असताना करोडोंची रूपयांचे ऑक्सिजन प्लँट्स फक्त कागदावरच लूटून खाल्ले. तसेच आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात उर्दूभवन बांधण्यात अतिउत्साह दाखविला पण बीएमसीच्या अर्ध्या अधिक मराठी शाळांना टाळे लावले. 


अशा व्यक्तीच्या कृत्याचे तो फक्त मराठी आहे म्हणून आपण समर्थन करता का? नसल्यास त्याबाबत आपण उघड भूमिका केव्हा घेणार ? आता त्याला राजकारणाचा भाग आहे म्हणून त्यावर आपण हेतूपुरस्पर मौन बाळगणार का?


आणखी वाचा


मराठी "Not Welcome" म्हणणार्‍या...घरं नाकारणाऱ्यांना...; निवडणुकीच्या धामधुमीत अभिनेत्री रेणुका शहाणेची पोस्ट चर्चेत