मुंबई: बिहारमध्ये आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे सिंघम अशी ओळख निर्माण केलेले आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. बिहार पोलीस दलात 18 वर्षे काम केल्यानंतर शिवदीप लांडे (Shivdeep Lande) यांनी हा निर्णय घेतला होता. शिवदीप लांडे यांनी तडकाफडकी पोलीस दलातून राजीनामा दिल्याने अनेक चर्चांना उधाण होते. त्यांच्या या निर्णयाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. तसेच त्यांनी अचानक राजीनामा का दिला असावा, असा प्रश्न अनेकांना पडला होता. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय पोलीस सेवेतून राजीनामा दिल्यानंतर शिवदीप लांडे हे आता राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, शिवदीप लांडे हे प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षात प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे. येत्या 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या पक्षाचा महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आहे. या कार्यक्रमात बिहारमधील अनेक निवृ्त्त पोलीस आणि सनदी अधिकारी जनसुराज पक्षात प्रवेश करु शकतात. यामध्ये शिवदीप लांडे यांचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. शिवदीप लांडे यांनी जनसुराज पक्षात प्रवेश केल्यास ते पुढील वर्षी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Election 2024) जनसुराज पक्षाच्या तिकीटावर पाटणा शहरातील एखाद्या मतदारसंघातून लढू शकतात. बिहारमध्ये शिवदीप लांडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. याच भांडवलाच्या जोरावर शिवदीप लांडे राजकीय आखड्यात उतरणार असल्याची चर्चा आहे. 


शिवदीप लांडे हे राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत. 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले शिवदीप लांडे हे सध्या बिहारच्या स्पेशल टास्क फोर्समध्ये अधीक्षक होते. त्यांच्या बेधडक कामाच्या पद्धतीमुळे ते बिहारच्या जनमानसात प्रचंड लोकप्रिय आहेत. मध्यंतरी त्यांनी  मुंबईत अमली पदार्थ विरोधी कक्षातही काम केले होते. तेव्हाही  शिवदीप लांडे यांनी ड्रग्ज तस्करांचे कंबरडे मोडले होते. तर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त असताना अनेक महत्वाचे गुन्हे उघडकीस आणले होते. राज्यात गाजलेल्या मनसुख हिरण हत्याप्रकरणाच्या तपासातही शिवदीप लांडे यांचा समावेश होता.


राजीनामा दिल्यानंतर शिवदीप लांडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटले होते?


प्रिय बिहार, गेली 18 वर्षे सरकारी पदाच्या माध्यमातून सेवा केल्यानंतर मी आता माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. माझ्या या सगळ्या कार्यकाळात मी बिहार राज्याला स्वत:पेक्षा आणि कुटुंबापेक्षा सर्वोच्च मानले आहे. माझ्या सेवेच्या काळात माझ्याकडून कोणतीची चुकभूल झाली असेल तर मी त्यासाठी क्षमस्व आहे. मी भारतीय पोलीस सेवेतून राजीनामा दिला आहे. मात्र, मी बिहारमध्येच (Bihar) राहणार आहे. यापुढेही बिहार हीच माझी कर्मभूमी असेल, असे शिवदीप लांडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते.


आणखी वाचा


बारबालांना लपवण्यासाठी शौचालयात गुहा, IPS शिवदीप लांडेंची धडक कारवाई