मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता महापालिका निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार? याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. काही महिन्यांमध्ये महापालिका निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. महायुतीच्या नेत्यांनी यावेळी मुंबई पालिकेवर सत्ता मिळवण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान निवडणुका सुरू होण्याआधी किंवा चर्चा, जागावाटप यांच्या चर्चा होण्याआधी जागा वाटप आणि युतीतील मित्रपक्षाविरोधात आक्षेपार्ह टिपण्णी न करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील नेत्यांना दिल्या आहेत. 

जागा वाटपाचा निर्णय हे महायुतीतील तीन प्रमुख नेते घेतील

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदेंनी पक्षातील नेत्यांना कानमंत्र दिला आहे. जागा वाटप आणि युतीतील मित्रपक्षाविरोधात आक्षेपार्ह टिपण्णी न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. मित्र पक्षातील संबध ताणले जातील, एकमेकांवरती कुरघोडी टाळण्यासाठी शिंदेकडून उत्तराला प्रतिउत्तर देताना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जागा वाटपाचा निर्णय हे महायुतीतील तीन प्रमुख नेते घेतील, त्यावर इतर नेत्यांनी भाष्य करू नये अशी सूचना माजी नगरसेवकांच्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी काल (बुधवारी) मुंबईतील माजी नगरसेवकांना मार्गदर्शन केलं.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मंत्र्यांवरही विशेष जबाबदारी

दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मंत्र्यांवरही विशेष जबाबदारी राहणार आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांना मुंबईतील विविध विभागांच्या नियोजनासोबतच मुंबईत वास्तव्यास असलेल्या मतदार संघातील नागरिकांचे मेळावे घेऊन एक संघठीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोणीही मित्रपक्षांबद्दल, जागावाटपाबाबत किंवा युतीतील मित्रपक्षाविरोधात आक्षेपार्ह  वक्तव्य करण्याचे टाळण्याबाबत शिंदेंनी सूचना दिल्या आहेत.

मुंबईतील बैठकीबाबत एकनाथ शिंदेंनी दिली माहिती 

एकनाथ शिंदे यांनी काल (बुधवारी) मुंबईतील माजी नगरसेवकांना मार्गदर्शन केलं. त्याची माहिती त्यांनी त्यांच्या सोशल मिडिया एक्सवरून दिली आहे. "विविध राजकीय पक्षांतून #शिवसेना पक्षात सामील झालेल्या मुंबईतील माजी नगरसेवकांसोबत आज संवाद साधला. आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना तयारीला लागण्याचे निर्देश याप्रसंगी दिले. महायुतीचे सरकार अस्तित्वात आल्यावर गेल्या अडीच वर्षात केलेली रस्ते काँक्रीटीकरणाची कामे, एसटीपी उभारणीची कामे, सुशोभीकरणाची कामे, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, आरोग्य सुविधा वाढवण्याची कामे असतील, कोस्टल रोड, मेट्रोची अशा अनेक लोकोपयोगी कामांची माहिती त्यांना दिली. ही सर्व कामे या माजी नगरसेवकांना समजावून सांगितली आणि ती कामे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवावी असे आवाहन याप्रसंगी केले". 

"मुंबई शहर आमूलाग्र बदलत असून ते खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय शहर म्हणून नावारूपाला येत आहे. राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण नुकतेच जाहीर केले आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती केली जाईल तसेच रखडलेल्या इमारतींचा शासकीय यंत्रणांच्या भागीदारीतून पुनर्विकास करण्यात येईल. ज्यामुळे मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत येऊन राहू शकेल. या धोरणाची माहिती त्यांना यावेळी करून दिली. त्यासोबतच त्यांच्या विभागातील प्रश्न, त्यांच्या अडचणी यादेखील जाणून घेतल्या आणि त्या सर्व नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू असे आशवस्त केले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, माजी खासदार राहुल शेवाळे, सचिव संजय मोरे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी यावेळी आवर्जून उपस्थित होते", अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पोस्टमधून दिली आहे.