Arvind Kejriwal : दिल्ली विधानसभेत  (Delhi Assembly)  अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 58 मते पडली. तर एकही आमदार विरोधात उभा राहिला नाही. उपसभापतींसोबत झालेल्या वादानंतर तीन भाजप आमदार विजेंदर गुप्ता, अभय वर्मा आणि मोहन सिंग बिश्त यांना सभागृहाबाहेर करण्यात आले. विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर केजरीवाल म्हणाले की, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या विरोधात खोटा खटला दाखल करण्यात आला होता आणि सीबीआयला त्यांच्या तपासात काहीही आढळले नाही.


'आमदार विकले गेले नाही'


यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, आज दिल्लीत भाजपचे ऑपरेशन लोटस अयशस्वी झाले आहे. सुमारे 10 राज्यातील आमदार 20 कोटींना विकत घेतले. दिल्लीतही 40 आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न झाला. 20 कोटी कमी झाले नसते पण इथे कोणी विकले गेले नाही. ते म्हणाले की, आपचा एक आमदार तुरुंगात, एक कॅनडात आणि तिसरा ऑस्ट्रेलियात आहे. यानंतरही आमच्या बाजूने 58 मते पडली आहेत.


संगम विहार प्रकरणावर केजरीवाल म्हणाले


संगम विहार प्रकरणाबाबत अरविंद केजरीवाल म्हणाले की, मुलीला सर्वोत्तम उपचार दिले जातील आणि दोषींना कठोर शिक्षा केली जाईल. ते म्हणाले की, एका अहवालात दिल्ली महिलांसाठी सर्वात असुरक्षित असल्याचे म्हटले आहे. नायब राज्यपाल आणि केंद्र सरकारने यावर कारवाई करावी.


आपचे तीन आमदार अनुपस्थित


विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर केजरीवाल म्हणाले की, आम आदमी पक्षाकडे एकूण 62 आमदार आहेत. दोन देशाबाहेर आहेत, एक तुरुंगात आहे. चौथा सदस्य हा सभागृहाचा अध्यक्ष असून आमच्या बाजूने एकूण 58 मते पडली आहेत. प्रत्यक्षात पक्षाचे तीन आमदार विधानसभेला उपस्थित राहू शकले नाहीत.


दरम्यान, दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनादरम्यान सोमवारी प्रचंड गदारोळ झाला. यावेळी आपचे आमदार दुर्गेश पाठक यांनी दिल्लीच्या नायब राज्यपालांवर खादी घोटाळा केल्याचा आरोप केला. आप आमदारांच्या म्हणण्यानुसार, हा घोटाळा 2016 मध्ये नोटाबंदीच्या वेळी झाला होता. त्यावेळी एलजी सक्सेना खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष होते. आपने जुन्या नोटांऐवजी नव्या नोटा दिल्याचा आरोप करत हा 1400 कोटींचा घोटाळा असल्याचे म्हटले होते. यानंतर  या प्रकरणाची चौकशी सुरू होईपर्यंत त्यांना एलजी पदावरून हटवण्यात यावे. या मागण्यांबाबत आपच्या आमदारांनी दिल्ली विधानसभेच्या आवारात रात्रभर धरणे आंदोलन केले होते.