मुंबई : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण, बीडमधील गुन्हेगारी आणि कृषी विभागातील भ्रष्टाचारावरुन आक्रमक झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सातत्याने मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भेट घेऊन पुरावे देखील दिल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, अद्यापही धनंजय मुंडेंचा (Dhananjay munde) राजीनामा घेण्यात आला नाही, याउलट राष्ट्रवादीकडून दमानिया यांनाच ट्रोल केलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी ट्विट करत अंजली दमानियांवर (Anjali Damania) गंभीर आरोप केले आहेत. दमानिया यांचं नाव घेत त्यांनी रिचार्जवाल्या बाई म्हणत 25 खोक्यांचा आरोप केला आहे. मात्र, या ट्विटनंतर अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त करत थेट गृहमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनाच चॅलेंज केले आहे. माझ्या सर्व बँक खात्यांची चौकशी करावी अन्यथा सूरज चव्हाणला शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका दमानिया यांनी घेतली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांना माझं थेट आवाहन आहे. ताबडतोब माझी सगळीच्या सगळ्या खाती सरकारने तपासावी, कुठेही एक दमडी देखील अनकाऊंटेड आहे का ते पाहावे, असे चॅलेंजच सामाजिका कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे प्रकरणात केलेल्या आरोपावरन दिले आहे. इतका अमाप भ्रष्टाचार होतोय आणि मी लढू नये? स्वतःच्या जीवाची पर्वा ना करता लढणाऱ्या लोकांचा असा मानसिक छळ करणार? राजकारणात पुढे जाण्यासाठी, नेत्याला खुश करण्यासाठी खालच्या पातळीला जाऊन हे बोलतात ना? योग्य आहे हे? असा सवालही दमानिया यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
दोघांनाही माझी विनंती, माझी ताबडतोब चौकशी करावी, माझ्या सगळ्या बँक खात्यांची ताबडतोब चौकशी करावी. होऊन जाऊ दे, मी भ्रष्ट असेन तर मला शिक्षा झाली पाहिजे आणि जर नसेल तर मग ह्या सूरज चव्हाणला योग्य ती शिक्षा द्यावी, अशा शब्दात अंजली दमानिया यांनी गृहमंत्र्यांना टॅग करुन आपली बाजू मांडली आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरच चव्हाण यांनी नाव घेता ट्विट करुन अंजली दमानिया यांच्यावर गंभीर आरोप केल होते. रिचार्जवाल्या ताईंना 25 खोक्यांचा बॅलन्स टाकण्यात आल्याचे सूरज चव्हाण यांनी म्हटले होते. त्यावरुन, अंजली दमानियांनी आता थेट गृहमंत्र्यांना चॅलेंज देत तपास करण्याची मागणी केली आहे.
सूरज चव्हाणाचं ट्विट काय?
मंत्री धनंजय मुंडेंवर होत असलेल्या आरोपासंदर्भाने ट्विट करत सूरज चव्हाण यांनी नाव न घेता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना लक्ष्य केलं. ''धनंजय मुंडे साहेबांवर आरोप करण्यासाठी रिचार्जवाल्या ताईच्या खात्यावर 25 खोक्याचा बॅलन्स टाकण्यात आला आहे. काहीही काम न करता वर्षाला पंधरा देश फिरणाऱ्या अडीच कोटी टॅक्स भरणाऱ्या "स्वयंघोषित" समाजसेविका ताई कोणाच्या माध्यमातून तुमचा रिचार्ज झाला पुराव्यासह ....लवकरच.'' असे ट्विट सूरज चव्हाण यांनी केले आहे. त्यामुळे, आता अंजली दमानियांनी प्रत्युत्तर दिल्याने सूरज चव्हाण यांच्या ट्वटिमध्ये किती तथ्य हे लवकरच स्पष्ट होईल. तसेच, त्यांचे हे ट्विट केवळ स्टंटबाजी तर नाही ना याचाही उलगडा होईल.