Amit Thackeray On Manoj Jarange Patil Protest: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईत दाखल झाले होते. गेल्या तीन दिवसांपासून आंदोलकांचे खाण्या-पिण्याचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. याचदरम्यान, मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मनसैनिकांना महत्वाचं आवाहन केलं आहे. अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मराठा आंदोलकांना अन्न-पाणी पुरवा, असं आवाहन केलं आहे. 

अमित ठाकरे नेमकं काय म्हणाले?

माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो,

सध्या आपल्या मुंबईत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी जमले आहेत. मराठा आरक्षण हा विषय शासनाच्या हाती आहे, त्याचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल. पण एवढं मात्र नक्की, आज जे इथे उभे आहेत ते आपले बांधव आहेत. हे शेतकरी आहेत, मजूर आहेत, लहानशा जमिनीवर पोट सांभाळणारे आहेत, शिक्षणासाठी धडपडणारे युवक आहेत… म्हणजेच मराठा समाजातील प्रत्येक स्तरातील, प्रत्येक जीवन जगणारी आपलीच माणसं आहेत. ते आपल्या घरापासून, गावापासून, शेतापासून दूर येऊन इथे आंदोलन करीत आहेत. त्यांना काही कमी पडू नये, त्यांच्या मुलांच्या, आई-वडिलांच्या डोळ्यात पोटाची चिंता दिसू नये, ही जबाबदारी आपली आहे, असं अमित ठाकरे म्हणाले.

माझं प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला स्पष्ट आवाहन आहे,- जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना अन्न-पाणी पुरवा.- औषधोपचारात कोणतीही अडचण येऊ देऊ नका.- त्यांच्या राहण्याची, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या.- एकही मराठा बांधव असा राहू नये की ज्याला वाटेल की तो मुंबईत एकटा आहे.

लक्षात ठेवा, ते आपलेच आहेत. त्यांची लढाई जरी आरक्षणासाठी असली, तरी ते आपली जबाबदारी आहेत, आणि आपण महाराष्ट्र सैनिक म्हणून आपली जबाबदारी पूर्ण पार पाडणार आहोत. आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो, तर त्यांचं मनोबल दुप्पट होईल. आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक या भावनेनं उभा राहील, ही मला खात्री आहे, असं अमित ठाकरेंनी सांगितले. 

मनोज जरांगेंनी राज ठाकरेंवर केली होती टीका-

मराठा मोर्चा आणि आरक्षणाबाबत सर्व गोष्टींची उत्तरं एकनाथ शिंदेच देऊ शकतील. मनोज जरांगे परत का आले याचंही उत्तर एकनाथ शिंदेंना विचारा. जेव्हा एकनाथ शिंदे येतील तेव्हा त्यांना विचारा मुंबईकरांना खूप त्रास होतोय,  एकनाथ शिंदे मागच्यावेळी नवी मुंबईत गेले होते, त्यावेळी त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आले, या प्रश्नांची सगळी उत्तरं एकनाथ शिंदे देतील, असं राज ठाकरे म्हणाले होते. राज ठाकरेंच्या या विधानावर मनोज जरांगे यांनी हल्लाबोल केला होता. 

राज ठाकरे कुचक्या कानाचा- मनोज जरांगे

राज्यातल्या समाजाचं म्हणणं आहे की, ते दोघे भाऊ चांगले आहेत. ब्रँड चांगला आहे. पण, हा विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नांमध्ये पडतो. त्याला आम्ही कधी विचारले का तुला 11 ते 13 आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले? त्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात केव्हा आला?, आम्ही तुला विचारले का तू काल पुण्यात केव्हा आला? तुला विचारले का तुझी नाशिकची सासरवाडी आहे तू 50 वेळा नाशिकला का येतो? आम्ही विचारलं का? एक लोकसभेला फडणवीसने तुझा गेम केला. त्यानंतर विधानसभेला तुझं पोरगं त्याने पाडलं. तरी तू त्याची री ओढतो. राज ठाकरे  कुचक्या कानाचा, मानाला भुकालेलं पोरगं आहे. त्याच्या घरी फडणवीस चहा पिऊन गेला सगळा पक्ष बरबाद झाला तरी त्याला चालतं. आमच्या खेड्यात याला कुचक्या कानाचं म्हणतात, असा हल्लाबोल त्यांनी राज ठाकरेंवर केला होता.

संबंधित बातमी:

Manoj Jarange Patil on Raj Thackeray : राज ठाकरे कुचक्या कानाचा, मानाचा भुकेला, फडणवीस घरी येऊन चहा घेऊन गेल्यानंतर पक्ष बर्बाद झाला तरी चालतो; मनोज जरांगेंची घणाघाती टीका