पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत मेळाव्याला संबोधित केल. यावेळी अजित पवारांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. खासदारकीला आणि आमदारकीला काय झालं हे असलं काय सांगू नका सगळे लोक आपलेच आहेत. साहेबांवर माझंही प्रेम आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं.  तर, ही निवडणूक बारामतीची पुढची दिशा कशी असेल हे ठरवणारी असल्याचंही त्यांनी म्हटलं.  

 माळेगाव आणि बारामतीचा मेळावा घेता आहे.निवडणुकीसाठी वेळ कमी मिळाला आहे.प्रत्येक पक्ष बैठक घेत आहे.माझं घर म्हणून बारामती आणि माळेगाव मध्ये लक्ष देणे गरजेचे आहे.एबी फॉर्म देण्याची मुदत 17 तारखेपर्यंत आहे.बारामतीची पुढची दिशा कशी असेल याची निवडणूक आहे, असं अजित पवार म्हणाले. 

2017 मध्ये बारामती नगरपालिकेचं उत्पन्न 17 कोटी होतं.गेल्या दहा वर्षांत मी 3300 कोटीची कामे आणली.269 कामे पूर्ण तर 164 कामे सुरू आहेत, असं अजित पवार म्हणाले. 

आपल्या विरोधात सगळ्यांची एकी करून पॅनल करण्याचा प्रयत्न करत आहेत. 46 जागांसाठी 325 लोकांनी मागणी केली आहे.1 लाख 2 हजार मतदार आहेत.मतदान करताना जातीचा पातीचा विचार करू नका फक्त घड्याळाचा विचार करा. हे अजित पवारांचं बारामतीचं घड्याळ आहे असं समजून मतदान करा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं. 

अजित पवार या भाषणात पुढं म्हणाले की एकाने माझ्याच गाडीला कट मारला. ड्रायव्हरला म्हटलं चल त्याला सोडू नको पोलिसांना सांगितलं त्याला पकडायला जेव्हा त्यांनी पकडलं त्यावेळेस त्याच्याकडे लायसन्स नव्हतं. त्यावेळेस त्याला विचारलं तू पळून का गेला त्यावेळेस तो म्हटला मला भीती वाटते.कोणी नियमात वागत नसेल तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करा आणि त्याला तडीपार करायचा, असं अजित पवार म्हणाले.

नियमाच्या बाहेर जाल तर आम्ही खपवून घेणार नाही आम्हाला कुणालाही त्रास द्यायचा नाही. आमच्या इथं सलोख्याचे वातावरण राहो हीच आमची भावना आहे.मला अनेकांनी नाव सुचवली, जय पवार यांचे देखील नाव सुचवलं.आमच्या घरात आमचे भावंड सोडले तर फक्त मलाच राजकारण यायची आवड होती.आपल्याला विकास करायचा आहे की गटातटाच राजकारण करायचं हे आपण ठरवायचं आहे, असं अजित पवार म्हणाले.

एक पोरगी माझ्याकडे आली आणि म्हणाली दादा मी लहानाची मोठी इथे झाली. तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून मी मुलाखतीला आले, असंही अजित पवारांनी सांगितलं. 

जेवढा मी घरचा बघत नाही तेवढा मी सार्वजनिक बाबीचा बघतो. नुसते पैसे देऊन काम होत नाहीत. तुम्ही माळेगावच्या बाहेर असाल किंवा बारामती बाहेरचे असतात तुम्हाला पद ही राष्ट्रवादी काँग्रेसमुळे मिळाले आहेत, त्यामुळे तुम्ही इथे वेळ दिला पाहिजे.

प्रचाराला फक्त सात दिवस आहेत मी सभा घेणार आहे. काहीजण इतका उतमात करतायेत, घमेंड्याने बोलतात. आपण निवडणुका संपल्यानंतर आपणच आहोत काहीजण ह्याला बोलव, त्याला बोलव तू लढ मी बघतो असं म्हणतायेत, या गोष्टीकडे जास्त लक्ष देऊ नका, अजित पवारांनी सांगितलं. 

माझंही साहेबांवर प्रेम :अजित पवार 

खासदारकीला आणि आमदारकीला काय झालं हे असलं काय सांगू नका. सगळे लोक आपलेच आहेत.एका बाजूला मी आणि एका बाजूला आदरणीय पवार साहेब आहेत. एका बाजूला मी आणि एका बाजूला साहेब लोकांपुढे पेच प्रसंग होताच ना, लोकांचे प्रेम का असू नये माझे प्रेम आहे. जरा मोठ्या मनाचं व्हा ना.. आपण इतक्या दिवस एकत्रच होतो ना, मला निवडून द्यायला पवार साहेबच कारणीभूत आहेत ना, असं अजित पवार म्हणाले. 

खासदारकीला 48000 मत कमी पडली मग मला एक लाख मत कशी पडली हा येडा आहे काय? झालं गेलं गंगेला मिळालं. काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात.

एक मत इकडे एक तिकडे देतो असं नाही चालणार,पाव्हणं घड्याळ बघायचं आणि बटन दाबायचं.जेवढे तुम्ही मला निवडून द्याल तेवढी माझी मान जिल्ह्यात वाढणार आहे. जो काम करू शकतो तोच सुधारणा करू शकतो जो कामच करणार नाही तो काय करणार, असा सवाल देखील अजित पवारांनी केला.

आपल्याला विकासाचे राजकारण करायचं आहे. मला अनेक जण सांगतात दादा योग्य उमेदवार द्या. मी योग्यच देणार ना? 35 वर्ष घासली मी, केस उगाच गेलेत का?  मी काही जरी झालं तरी शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडणार नाही. रुसवे फुगवे बाजूला ठेवा गट तट बघू नका पक्ष म्हणून जो मी निर्णय देईल तोच आपला उमेदवार असेल.आपल्या विचाराचा नगराध्यक्ष आपण निवडून आणायचा आहे.तुम्ही फक्त एक दिलाने काम करा मग कोण माय का लाल आपल्याला हलवू शकत नाही, असं अजित पवार म्हणाले.

अनेक लोक इथे येतील भाषण करतील पण काम करणारा फक्त अजित पवारच असेल.मी एवढं काम करतोय दुसऱ्या तालुक्यात जर उभा केला असता तर बिनविरोध निवडून दिला असता. निवडणूक आली की पावसाळ्यात जशा छत्र्या उगतात तसे काही येतात. निवडणूक झाल्यानंतर त्यांनी कधी बारामती बघितलेय का असा सवाल अजित पवारांनी केला.