पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत एका मेळाव्याला संबोधित केलं. या मेळाव्यात अजित पवार यांनी लोकसभेला झालेल्या पराभवावर भाष्य केलं. विकासकामं करुन देखील जर बारामतीकर वेगळा निर्णय घेणार असतील तर बारामतीला देखील वेगळा आमदार मिळाला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. त्यानंतर माझ्या आमदारकीच्या कार्यकाळाची आणि नव्या व्यक्तीच्या कामाची तुलना करावी, असं अजित पवार म्हणाले. 


 मला एका गोष्टीची जाणीव आहे, कार्यकर्त्यांच्या जोरावर पक्ष चालतो. कार्यकर्ता पक्षाचा कणा असतो. त्या कण्यानं काम नाही केलं तर गडबड होते मान्य केलं पाहिजे. कोणतिही निवडणूक असो किंवा आजची बैठक असो, कार्यकर्त्यांच्या एकंदरित जिवावर निवडणूक आणि यश अवलंबून असते. माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते आता उपमुख्यमंत्रिपदापर्यंत अनेक जबाबदारी कार्यकर्त्यांमुळं मिळाली असं अजित पवार म्हणाले. 


 न मागता विकासकामं होत आहेत.. :अजित पवार  


कारण मी पण शेवटी माणूस आहे, मला पण विचार येतो एवढी सगळी कामं करुन बारामतीकर वेगळा निर्णय घेऊ शकतात. मग आपण तर दुसऱ्यांना खासदार करु शकतो. नितीन पाटलांना, प्रफुल पटेलांना खासदार केलं. आमदार राजेश विटेकरला केलेलं तुम्ही पाहिलं, शिवाजीराव गर्जे यांना आमदार केलं. अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मूठ सव्वा लाखाची चांगली.  आपण लाखानं निवडून येणारी माणसं, मी पण आता 65 वर्षांचा झालो. आपण पण तसं समाधानी आहे.जिथं पिकतं तिथं विकत नसतं,बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे, मग तुम्ही माझी 1991 ते 2024 या  माझ्या कारकिर्दीची तुलना करा आणि त्या माणसाचं काम बघा, असं अजित पवार म्हणाले. 


न सांगता रस्ता होतोय, न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होतात, आता किती कोटींच्या योजनांची कामं सुरु आहेत. बारामती शहर सोडून साडे सातशे कोटी रुपयांची कामं सुरु आहेत. कशाला म्हणतात साडे सातशे कोटी, यापूर्वी बारामती तालुक्यातील रस्ते कसे होते. आता कसे आहेत, काही खराब आहेत ते कसे करायचे ते पाहू, न मागता मेडिकल कॉलेज मिळतं, तुम्ही सांगितलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव द्या मग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेज केल्याचं अजित पवार म्हणाले. 


सकाळपासून उठून कामं करावी लागतात पण काही जण आमची चेष्टा करतात, त्याच्याबद्दल म्हणनं काही नाही, जे आहे ते आहे, असं अजित पवार म्हणाले. ही बारामतीच्या भवितव्याची निवडणूक आहे, सत्तेत असू तर अर्थकारणाला गती मिळणार आहे, असं अजित पवार म्हणाले. 



इतर बातम्या : 


Agri Scheme : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका विकास योजना नेमकी काय? 2 लाख 77 हजार 500 रुपयांचं अनुदान कुणाला मिळतं?


शेतकऱ्यांना केंद्र सरकार दरमहा 3000 रुपये पेन्शन देणार,पीएम किसान मानधन योजना नेमकी काय? पात्रता अन् अटी जाणून घ्या