Ajit Pawar & Sharad Pawar: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यादृष्टीने वातावरनिर्मितीही झाली होती. परंतु, ज्या शरद पवारांच्या (Sharad Pawar) वक्तव्यामुळे ही सगळी चर्चा सुरु झाली त्यांनीच आता या सगळ्या तर्कवितर्कांना ब्रेक लावणारे वक्तव्य केले आहे. जे सत्तेसाठी भाजपसोबत गेले, अशा संधीसाधू लोकांना आपल्याला सोबत घ्यायचे नाही. गांधी, नेहरु, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचे असलेल्यांना सोबत घेऊ, असे शरद पवार यांनी मंगळवारी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता मावळल्याचे संकेत मिळत आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपसोबत गेलेल्या संधीसाधूंना सोबत घेणार नाही, असे शरद पवारांनी म्हटल्याचे सांगत अजितदादांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी, 'प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे', अशी मोघम प्रतिक्रिया दिली. त्यामुळे आता राष्ट्रवादीतील दोन्ही गट एकत्र येण्याच्या प्रक्रियेचं पुढे काय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Sharad Pawar in Pune: शरद पवार नेमकं काय म्हणाले?
सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे, असे वारंवार म्हटले जात आहे. पण सगळे म्हणजे कोण? गांधी, नेहरु, फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे असले तरी त्यांना सोबत घेऊ. पण जे सत्तेसाठी भाजपसोबत (BJP) गेले, ही भूमिका कोणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा नाही. कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असू शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने संधीसाधूपणाचं राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही, त्या दिशेने आपल्याला पावलं टाकायची नाहीत, असे शरद पवार यांनी सांगितले.
आगामी पालिका निवडणुकीसाठी नव्या नेतृत्वाची फळी निर्माण करावी लागणार आहे. या नव्या फळीच्या मार्फत आपल्याला बदल घडवावा लागेल. आज आपल्याला हे चित्र बदलावे लागणार आहे. विकास असा करायचा आहे, ज्यातून भावी पिढीने प्रेरणा घ्यायला हवी. यासाठी संघटन मजबूत करावी लागेल. जे गेले त्यांची चिंता करू नका. मी असे अनेक प्रसंग पाहिले आहेत. माझ्यासोबतच्या अनेक सहकाऱ्यांनी साथ सोडली, पण ज्या-ज्यावेळी असं घडलं, तेव्हा मी चिंताग्रस्त झालो नाही. मला कार्यकर्त्यांनी खंबीर साथ दिली आणि जनतेने पाठिंबा दिला. त्यानंतरही मी सत्तेत आलेलो आहे. त्यामुळे कोण आला, कोण गेला याची चिंता करु नका. लोक शहाणे आहेत, आज ही लोकशाही जनतेच्या शहाणपणाने टिकलेली आहे. ती यापुढं ही टिकून राहणार आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.
आणखी वाचा