पुणे: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ विधानसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी कोणाला मिळणार, यावरुन सध्या वातावरण प्रचंड तापले आहे. मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना व्यासपीठावरुन आपल्या संभाव्य स्पर्धकांना धमकीवजा इशारा दिला. 'प्रत्येकजण मरायला आलाय' हे त्यांचे वाक्य सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. सुनील शेळकेंच्या या वक्तव्यानंतर अजित पवार (Ajita Pawar) यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुनील शेळके यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


मावळमध्ये महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. तिन्ही पक्षांमध्ये मावळच्या मतदारसंघासाठी (Maval Vidhan Sabha) रस्सीखेच सुरु आहे. याच मु्द्द्यावरुन सुनील शेळके यांनी भाष्य करताना म्हटले की, मला माहिती आहे की, येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. अनेकजण मावळमधून लढण्यास इच्छूक आहेत. पण महायुतीचा उमेदवार कोण, हे मलादेखील माहिती नाही. पण अनेकजण तयारी करत आहेत. प्रत्येकाला संविधानाने निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे. जनतेला पटलं तर तुम्हालाही आमदार, खासदार करतील. पण तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करताना मावळच्या जनतेला दहशतीखाली, दडपणाखाली आणू नका. मावळच्या जनतेला दहशतीखाली आणण्याचा प्रयत्न कराल तर दादा तुमच्यासमोर सांगतो की, सुनील शेळके हा अन्याय सहन करणार नाही. प्रत्येकजण मरायला आला आहे. जर तुम्हाला दादागिरी आणि दहशत करायची असेल तर सुनील शेळकेवर करा. माझ्या जनतेवर आणि सहकाऱ्यांवर दादागिरी करायची नाही, असे सुनील शेळके यांनी म्हटले.


अजित पवारांकडून सबुरीचा इशारा


सुनील शेळके यांनी आपल्या संभाव्य स्पर्धकांना धमकीवजा इशारा दिल्याने वाद निर्माण होणार, हे स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी भाषणाला उभे राहिल्यानंतर सुनील शेळके यांना सबुरीने वागण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, आज जरा सुनील आमचा, गाडी गरम होती. जरा सबुरीने घ्यायचं. आपल्याला सगळ्यांची गरज आहे. कोणाला नाराज करायचं नाही, कारण त्यामधून काही साध्य होत नाही. एक गोष्ट खरी आहे, खूप काम करुन त्रास झाला तर मनाला वेदना होतात, असे अजित पवार यांनी म्हटले. 


35 दिवसांनी विधानसभा निवडणुकीचे मतदान होईल: अजित पवार 


येत्या आठ ते दहा दिवसांत आचारसंहिता लागू होईल अन पस्तीस दिवसांनी मतदान होईल, असं म्हणत अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीचे संकेत दिलेत. आता समज-गैरसमज दूर करा, उमेदवारी मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र ज्यावेळी उमेदवार जाहीर होईल तेंव्हा हेवेदावे बाजूला ठेवून महायुतीचा धर्म पाळा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.


VIDEO: सुनील शेळके नेमकं काय म्हणाले?



आणखी वाचा


'अरे जरा जपून, तुला..', 5 महिन्यांपूर्वी शरद पवारांच्या तोंडून बाहेर पडलेले वाक्य खरे होणार? हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने काय साध्य होणार?